म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत सहा गावांचा नव्याने समावेश 

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश नसलेली लवंगी आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्दचा पूर्व भाग व येळगी या सहा गावांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

म्हैसाळ योजनेद्वारे १३ गावातील सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्राला या योजनेचे पाणी देण्याचे नियोजन केले. मात्र तालुक्यातील लवंगी, आसबेवाडी, शिवनगी सोड्डी सलगर बुद्रुक, सलगर खुर्दचा पूर्व भाग, येळगी ही गावे या योजनेतून लाभक्षेत्रात असूनही वगळण्यात आली. तालुक्यातून जाणाऱ्या बंद पाईपलाईने जतमधील क्षेत्राचा समावेश केला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी मिळणार नसेल तर ही योजना काय कामाची, असे म्हणत या योजनेचे सुरू काम बंद पाडले होते. 

जोपर्यंत या योजनेत या गावांचा समावेश होत नाही, तोपर्यंत हे काम सुरू न करण्याचा निर्णय घेतला. या गावाच्या प्रश्नाबाबत आ. तानाजी सावंत, जिल्हाप्रमुख शैला गोडसे सह शेतकऱ्यांनी लावून धरल्यानंतर मंत्रालयात याबाबत बैठक घेण्यात आली. जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी कमी केलेल्या सहा गावांचे फेर सर्व्हेक्षण करून अहवाल सादर करावा व त्यानंतर या सर्व गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले. वगळलेल्या गावातील शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

शिरनांदगी तलावातील म्हैसाळ पाण्यासाठी शैला गोडसे यांनी तब्बल 7 दिवस तलावातच ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा मुद्दा उपस्थित करताच २५ मार्चपासून दुसरे रोटेशन सुरू होत आहे. तोपर्यंत तलावात पाणी येण्यासाठी अपूर्ण असणारी सर्व कामे पूर्ण करून पाईपलाईनला चेबर काढण्याचे आदेश दिल्याने १५ एप्रिलपर्यंत या योजनेचे पाणी तलावात ऐन उन्हाळ्यात पाणी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. 

या बैठकीला तानाजी सावंत, कृष्णा खोरे, महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, कार्यकारी अभियंता विजय पाटील, जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना घाडी, समन्वयक शिवाजी सावंत, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शैला गोडसे, संभाजी शिंदे, संतोष माने, उपसंरपच रामचंद्र जाधव, संजय नागणे, समाधान आसबे, रमेश आसबे, अनिल जाधव, विनोद कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बंद पाईपलाईनमुळे बचत होणारे पाणी मंगळवेढ्याच्या हद्दीतील वगळलेल्या सहा गावाना उपलब्ध करताना त्या पाण्याबाबत नियोजन करावे,शेतकरी व नागरिकाच्या प्रश्नासाठी शिवसेना सदैव तत्पर राहील
- तानाजी सावंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com