व्हिडीओ : नव्वदीतही शेतात फिरतंय आवड्या बापूंचं खुरपं...

ninty years old man work in farm panhala marathi news
ninty years old man work in farm panhala marathi news

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) - डोक्‍याला टोपी, अंगरखा, हातात काठी, कमरेला गुंडाळलेला लंगोटा असा पेहराव. सकाळी नऊ वाजता शेतातील कामांना सुरवात. भांगलण करून दुपारी उन्हाच्या तडाख्यात सावलीत बसून सायंकाळ झाली, की पुन्हा घराची वाट धरायची, असा बापूंचा दिनक्रम. या बापूंचं वय आहे तब्बल नव्वद वर्षे; पण नव्वदीतही बापू एकदम फिट. बीपी, शुगर नसलेले हे बापू दररोज गावापासून शेतात पायी चालत जातात. 

आवड्या बापूंची शेतीची कामे करण्याची हौस भारी

आपल्या नातवंडांना मायेचा धाक दाखवायचा, थोडा शीण आला की, देवाचं नाव घेत घराचा कोपरा धरून बसायचं, हे या बापूंचं वय; पण वयाची शंभरी जवळ आली तरी आवड्या बापूंची शेतीची कामे करण्याची हौस अजून पूर्ण झालेली नाही. नव्वदीतही आवड्या बापूंच खुरपं आपल्या शेतात सरासरा चालत आहे. 
पन्हाळा तालुक्‍यातील पोहाळेतर्फ आळते येथील शामराव भगवंता साळोखे तथा आवड्या बापू हे वयोवृद्ध व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म पोहाळेत झाला. बापूंना शिक्षण घेता आलं नाही. पूर्वीच्या काळातील पारंपरिक खळी, पार, तालमी या ठिकाणी नाटक, रामायण-महाभारत भजने व्हायची. तीच त्यांची मनोरंजनाची साधने. 

असं पडलं 'आवड्या बापू' हे टोपण नाव

एका नाटकात आवड्या हे पात्र होते, त्या पात्रानुसार शामराव साळोखे यांना 'आवड्या बापू' हे टोपण नाव पडले आणि गाव व परिसरात बापू आवड्या बापू नावाने परिचित झाला. 
पूर्वी ग्रामीण भागातील जनजीवन पावसावर अवलंबून असे. येथील जमिनी खडकाळ व मुरमाच्या. त्यामध्ये भात, भुईमूग, ज्वारी, शाळू हीच पिके या ठिकाणी होत. यावरच सर्व गावातील कुटुंबाचा गाडा चालायचा. बापूंना कोवळ्या वयात शेतीची कामे करताना खूप त्रास व्हायचा. नांगरट करणे, बैलगाडी चालवणे ही कामे बापूंनी मन लावून केली आणि बापूंनी आपला संसार जोमाने थाटला. 

माझी शेती आणि येथील निसर्गच माझा मित्र

पूर्वी संपूर्ण कारभार चार आणे, आठ आण्यांवर चाले. त्यावरच बापूंनी भाऊ, बहिणी आणि मुलांची लग्ने करून दिली. 
बापूंनी आता नव्वदीतही आपला दिनक्रम सोडलेला नाही. रोज ते पहाटे पाचला उठतात, हिंडतात, फिरतात. अंगण व जनावरांचा गोठा झाडून काढणे ही कामेही ते करतात. बापूंचे निम्मे दात अजूनही शाबूत आहेत. दृष्टीही चांगली आहे. त्यांना ऐकूही चांगले येते. चालणे, फिरणे, खाणे याला त्यांनी महत्त्व दिले आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. नव्वदी पार केलेल्या बापूंनी शेतात राहणे पसंत केले आहे. शेतातील स्वच्छ खेळती हवा बापूंच्या अंगात भिनली आहे. काही झाले तरी डगमगायचे नाही, आपला दिनक्रम बदलायचा नाही, एवढे पथ्य बापूंनी आयुष्यभर पाळले आहे. जीवनातील ताणतणावांना पुरून उरलो आहे, माझी शेती आणि येथील निसर्गच मित्र असल्याचे बापू सांगतात. 

माझे सर्व आयुष्य शेतीतच गेले. वय झाले तरी मी शेतात जाणे सोडले नाही. शेतीत जाण्यामुळे माझा दररोज व्यायाम होतो. आरोग्य चांगले राहते. 
तरुण पिढी मोबाईल, टीव्हीमुळे बिघडत चालली आहे. काय नको ते ऐकायला बघायला मिळत आहे. पूर्वीचा जमाना बरा वाटतो. 

- शामराव भगवंता साळोखे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com