सोलापूर - शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी आमदार, खासदार आणि "डीपीडीसी'मधून उपलब्ध करून देण्यात येईल. संपूर्ण गाव निर्मल ग्राम करण्यासाठी गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला बचत गट यांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी टीम वर्क म्हणून काम करण्याची अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या पाणी, स्वच्छता व आरोग्य विभागातर्फे सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झालेल्या "स्वच्छता उत्सव' कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, आमदार हरीश पिंगळे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आदी उपस्थित होते.
खोत म्हणाले, की स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्य निर्मल करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. यात सोलापूर जिल्हा राज्यात पहिला आला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 29 ग्रामपंचायतींपैकी 467 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
शौचालय बांधकामामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2016-17 मध्ये शौचालय बांधकामाच्या 60 हजार 713 उद्दिष्टापैकी सोलापूर जिल्ह्याने 31 मार्च 2017 पर्यंत 1 लाख 5 हजार 236 शौचालये बांधून 173.33 टक्के काम पूर्ण केले आहे. हे काम कौतुकास्पद आहे.
जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचे सरपंच आदी अनेक पुरस्कारांचे वितरण याप्रसंगी करण्यात आले.
|