उन्हाळ्यात पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला

uplai
uplai

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असत. परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला. अन् समाजातील सहदयता संपली की काय? म्हणूनच दुष्काळात पाणपोया लुप्त होत चालल्याची खंत नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.

तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच पूर्वी सामजिक कार्यात अग्रेसर असणार्यां संस्था, संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील बसस्थानक व वर्दळीच्या ठिकाणी पाणपोई सुरू करायचे. यात काही संवेदनशील नागरिकदेखील स्वतःच्या घरासमोरील जागा पाणपोईसाठी उपलब्ध करून द्यायचे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे काम केले जायचे. रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली, की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायची आणि नंतरच पुढचा मार्ग धरायची. काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात ग्रामीण भागात हे चित्र दृष्टीस पडायचे. आज मात्र दुर्दैवाने अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे.

'पाणपोई' हा एक सामजिक उपक्रम व तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्याचे काम समजले जायचे. पाणी विकणे हा अपराध समजला जायचा. परंतु काळ बदलला आणि लोकांनी पाण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे जागोजागी आत्ता वाॅटरफिल्टर उभे झाले. शुद्ध अॅरोचे पाणी पिणे अलीकडे फॅशन झाली असल्याने पाणपोईतील पाणी पिणे कमीपणाचे लक्षण समजु लागले. त्यामुळे 'पाणपोई' लुप्त होऊ लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातुन येणार्यां नागरिकांची विकतची पाणी पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हाॅटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात. वास्तविक तहान कमी झालेली नाही. परंतु समाजातला सेवाभाव संपत चालल्याने पाणपोयांची संख्या मात्र झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.

बसस्थानकावर पाण्याची सोय नसल्याने प्रवाश्यांना विकतचे पाणी घेऊन पिणे शक्य नसते. यासाठी माढा बसस्थानकावर आम्ही पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. 
- डाॅ  सुभाष पाटील, रोटरी ट्रस्ट फाऊंडेशन माढा

सध्या उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे. रस्त्यावर जाणार्यां अबालवृध्द महिला व वयस्कर व्यक्तींना तहान लागल्यास हाॅटेल व चहाच्या टपरीचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे सामजिक बांधिलकीतुन नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतुने 'पाणपोई' सुरू केली आहे..
महेश चवरे, मालक - धनराज व्हिडिओ सेंटर माढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com