आमदार जयकुमार गोरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध

BJP Maan
BJP Maan

दहिवडी : ''ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे, त्यांनी भाजपमध्ये येऊन पाच वर्षे काम करुन पक्ष वाढवावा. त्यानंतर आमदार, खासदार नव्हे, तर नरेंद्र मोदींना बाजूला सारून पंतप्रधान व्हावं. मात्र, फक्त विधानसभेवर टपून जर कोणी पक्षात येऊ पाहात असेल, तर त्याला आमचा विरोध आहे,'' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माण विधानसभा मतदारसंघ संघाचे अध्यक्ष डाॅ. महादेव कापसे यांनी केले. तसेच 'लग्नाची दारात, ठेवलेली घरात' हे धोरण चालणार नाही, असे म्हणत आमदार जयकुमार गोरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यास विरोध करणारा ठराव करण्यात आला.

दहिवडी येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांची बैठक आज (रविवार) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार गोरे यांच्यावर टीका करतानाच त्यांच्या उमेदवारीस विरोध केला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, माढा लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक बाळासाहेब खाडे, विजयकुमार साखरे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. उज्ज्वलकुमार काळे, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विजय पाटील, भाजप युवा मोर्चाचे संतोष हिरवे, अशोक पवार, दादासाहेब काळे, अनुसुचित जाती-जमाती जिल्हा उपाध्यक्ष मनोहर लोखंडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डाॅ. कापसे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून लोकसभेच्या उमेदवारास निवडून देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. मात्र, विधानसभेला निष्ठावंतांना डावलून आज-उद्या येणारांना संधी दिली, तर भाजपचे कार्यकर्ते वेगळा निर्णय घेऊ शकतील.

आमदार गोरे यांच्यावर जोरदार टीका करताना अनिल देसाई म्हणाले की, रावण हा रावणच असतो, तो अयोध्येत आला तरी त्याचा राम होत नसतो. त्यांचा जनाधार संपलाय म्हणून ते भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं. त्यामुळे नसलेल्या जनाधाराची टिमकी वाजवू नये. भाजप व त्याच्या मित्रपक्षाच्या ज्याला संधी मिळेल, त्याचं आम्ही काम करू. मात्र, असल्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या माणसांची भाजपला गरज नाही. विधानसभेला ह्या चुकीच्या प्रवृत्तीला गाडल्याशिवाय राहणार नाही.

विजयकुमार साखरे यांनी आमदार गोरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चौऱ्याहत्तर मते होती, यावेळी शहान्नव हजार मते आहेत. यात आमदारांचं एकही मत नाही. किती मते दिली ते आकडेवारीसह सिद्ध करावे. जर आमदारांच्या मागे जनता आहे, तर भाजपचा सदरा धरायची गरज नव्हती. फक्त मोदी लाटेचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसमध्ये राहून भाजप चालविण्याच्या भ्रमात त्यांनी राहू नये. निवडून येणार नाही हे लक्षात आलंय, म्हणूनच ते भाजपच्या मागे लाळ घोटत आहेत.

ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलं नाही, असा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला. डाॅ. काळे यांनी सांगितले की, अमित शहा यांच्या वन बुथ, टेन युथ या धोरणाला हरताळ फासण्याचं काम करुन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रतिनिधी फाॅर्म मिळू न देण्याचं काम आमदारांनी केलं. जालिंदर खरात यांनी प्रास्ताविक केले, तर तानाजी काटकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com