पावनखिंडीचा आनंद आता सहजसाध्य

पावनखिंडीचा आनंद आता सहजसाध्य

कोल्हापूर - पन्हाळ्याहून पावनखिंडीला जंगलवाटेतून जाण्याची खूप इच्छा आहे. शिवाजी महाराज ज्या वाटेने विशाळगडाला पोहोचले, त्या वाटेचा इतिहास अनुभवायचा आहे... पण एवढे अंतर पार करणे काहींना अवघड वाटत आहे. अशांसाठी पन्हाळा-पावनखिंड मोहिमेचे तीन टप्पे यावर्षी करण्यात आले आहेत. या मोहिमेत पन्हाळ्याहून थेट सहभागी न होता, खोतवाडी व माळवाडी येथून सहभागी होऊन या मोहिमेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणे यामुळे सर्वांना शक्‍य होणार आहे. २१ जुलै रोजी ही मोहीम आहे.

‘पावनखिंड मोहीम सर्वांसाठी’ या जाणिवेने करवीर हायकर्सच्या वतीने ही मोहीम थोडी सोपी व सुलभ करण्यात आली आहे. यासंदर्भात या मोहिमेचे संयोजक दीपक सावेकर यांनी सांगितले, की आम्ही दरवर्षी पहाटे पाचला पन्हाळ्यावरून निघतो व सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावनखिंडीत जाऊन पोहोचतो; पण जोराचा पाऊस, वारे, चिखलाच्या उंच-सखल वाटा यांमुळे हे अंतर सर्वांना पार करता येत नाही; मात्र ‘या मोहिमेत सहभागी करून घ्या, थोडे अंतर तरी आम्हाला चालू द्या,’ असा असंख्य लोकांचा आग्रह असतो. त्यांत वयोवृद्ध स्त्रीपुरुष असतात. काही अपंग असतात. लहान मुलांचा उत्साह असतो. काही महिलाही सहभागी होऊ इच्छितात. त्यांनाही या मोहिमेत काही अंतर (किमान २० ते २५ किमी)  सहभागी होता यावे, त्यांनाही मोहिमेचा काही काळ तरी थरार अनुभवता यावा, यासाठी आम्ही मोहिमेचे तीन टप्पे केले आहेत.

पन्हाळा-पावनखिंड या मोहिमेला गेल्या काही वर्षांत वारीचे स्वरूप आले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान, हिल रायडर्स ॲण्ड हायकर्स, निसर्गवेध, कोल्हापूर हायकर्स, न्यू हायकर्स, आनंदराव पोवार मर्दानी खेळाचा आखाडा, मैत्रेय, भरारी ग्रुप, करवीर हायकर्स, गडकोट या व अन्य काही संस्था या मोहिमेचे स्वतंत्रपणे आयोजन करतात. १२ व १३ जुलै हा मोहिमेचा मुख्य दिवस असतो; पण त्याच दिवशी पावनखिंड व पावनखिंड मार्गावर मोठी गर्दी होत असल्याने वेगवेगळ्या तारखांना मोहीम आयोजित केली जाते. या मोहिमेत सहभागी होण्याची अनेकांची इच्छा असते; पण अंतर, मोहिमेचा मार्ग व पूर्ण मार्गात भन्नाट पावसाचा मारा यांमुळे अनेकांना मोहिमेपासून नाइलाजाने लांब राहावे लागते; पण आता मात्र ही ‘पावनखिंड मोहीम सर्वांसाठी’ शक्‍य झाले आहे. 

ज्यांची मोहिमेचे पूर्ण अंतर चालण्याची क्षमता आहे, ते पहाटे पाच वाजता मोहिमेत सहभागी होतीलच; पण ज्यांना मधूनच मोहिमेत सहभागी व्हायचे आहे व पावनखिंडीपर्यंत जायचे आहे, ते खोतवाडी माळवाडी येथे सहभागी होऊ शकतील. २१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता त्यांना कोल्हापुरातून खास वाहनाने खोतवाडी, माळवाडीपर्यंत आणले जाणार आहे. तेथून ते मोहिमेचा काही अंतर तरी थरार अनुभवत पावनखिंडीपर्यंत पोहोचू शकणार आहेत.
- दीपक सावेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com