पन्हाळा प्रदक्षिणेतून इतिहासाला उजाळा

पन्हाळा प्रदक्षिणेतून इतिहासाला उजाळा

पन्हाळा - तरुण पिढीत इतिहासाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि धाडस निर्माण व्हावे, या हेतूने आयोजित केलेल्या आजच्या पन्हाळा प्रदक्षिणा मोहिमेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील चार हजारांहून अधिक गडप्रेमी युवक-युवतींनी गडाला तटबंदीखालून प्रदक्षिणा घातली.    

गडाची तटबंदी, बुरुज, गडाखालचे निसर्ग सौंदर्य पायवाटेवरून चालताना न्याहाळत छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे चारशे वर्षांपूर्वी कोणत्याही सुविधा नसताना स्वराज्यासाठी कसे लढले असतील याचा इतिहास जागवला. आज सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोहिमेच्या झेंड्याचे पूजन करून मोहिमेला सुरूवात झाली. 

हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशन आणि संवेदना सोशल फौंडेशनतर्फे पन्हाळा प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेची नोंद एशियन, ग्लोबल आणि नॅशनल रेकॉर्डमध्ये होणार आहे. बुक ऑफ रेकॉर्डचे राज्य प्रतिनिधी प्रा. महेश कदम यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. चार दरवाजा ते रेडेघाट, नरसिंह खिंड, तीन दरवाजा, पुसाटी, राजदिंडी, तबकवन ते आपटी मार्गे परत चार दरवाजा अशी ११ किलोमीटरची मोहीम युवक-युवतींनी अनोळख्या पायवाटेने, घसरत, पडत, जाळ्या, झुडपांचा आधार घेत पार पाडली. मार्गावर तीन टप्पे केले होते. 
प्रत्येक टप्प्यावर संयोजकांतर्फे नाष्टा, सरबत, फळे देण्याची व्यवस्था केली. मोहीम चार दरवाजांत परत आल्यानंतर ‘जय शिवाजी जय भवानी ’च्या घोषणा तरुण देत होते.

मोहिमेत संजीवन विद्यानिकेतन, पन्हाळा विद्यामंदिर, एकलव्य, पन्हाळा पब्लिक स्कूल, कोडोली हायस्कूल, वारणा विद्यामंदिर, कोल्हापूर पब्लिक स्कूल, खेळघर या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सायंकाळी चार वाजता मोहिमेत सहभागी झालेल्यांना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. या मोहिमेसाठी हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील, संवेदना फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी  महिनाभर प्रदक्षिणेचा मार्ग तयार करणे, त्यातील झुडपे काढणे, मार्ग दर्शवणारे पट्टे ओढणे आणि आज स्वयंसेवकांची भूमिका अशी कामे केली. कार्यक्रमाला नगराध्यक्षा रूपाली धडेल, असिफ मोकाशी, संजीवनचे संस्थापक पी. आर. भोसले आदी 
उपस्थित होते.

पुलवामासारख्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक पातळीवर दोन देशांच्या दरम्यान स्पर्धा निर्माण झाल्याने आपला देश मोठा झाला पाहिजे. ही भावना युवकांत विकसित होण्यासाठी तसेच तरुणाईला निसर्गाच्या सान्निध्यात आणून त्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी अशा मोहिमांची गरज आहे.
- चंद्रकांत पाटील
, पालकमंत्री.

गव्यांची भीती
पन्हाळा परिसरात सध्या गव्यांचे वास्तव्य असून काल त्यांचा कळप पुसाटीच्या खालच्या बाजूला विसावला होता. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दक्षता घेत तेथून तो हुसकावला; पण त्यातील चार गवे आज मोहीम चालू असतानाच रेडेघाटीच्या खालच्या बाजूस असलेल्या कुरणात निवांतपणे चरत होते. तटबंदीवरून लोक हे गवे पाहत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com