श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या पहिल्याच स्मृतिदिनानिमित्त कॉंग्रेस आघाडी फोडण्यासाठी रणनीती आखली गेली. कार्यक्रमाला आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सोबत घेत, नागवडे कुटुंबाशी बंद खोलीत राजकीय चर्चा केली. नागवडे यांनी वेगळा विचार करावा, यावरच पाटील यांनी भाषणात भर दिला होता.
शिवाजीराव नागवडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम राजकीय कोपरखळ्या, पक्षबदलाचे संकेत व नेत्यांच्या बंद खोलीतील चर्चेने गाजला. योगीराज महाराज पैठणकर म्हणाले, की "बापूं'च्या कार्याची व्याप्ती मोठी असून, या नेत्याला तालुक्यातच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात मान होता.
आमदार राहुल जगताप यांनी "बापूं'मुळे आमदार झाल्याचे सांगितले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही "बापूं'च्या कामाचा गौरव केला. "सध्या कोण कुठे पळतंय, हे समजत नाही. मध्यंतरी गायब झालेले हर्षवर्धन पाटील आज येथे सापडले,' असा थेट टोलाही मारला. त्यावर पाटील यांनी, ते "कायम रिचेबल' असतात, असे सांगितले. "नागवडे कुटुंबाने वेगळा विचार करावा. त्यासाठी विखे पाटील ते मुख्यमंत्री, असा प्रयत्न करावा लागेल,' असे सांगत नागवडे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सुचविले.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. विखे पाटील, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा केली. बैठकीतील चर्चेचा तपशील समजला नसला, तरी पाटील व डॉ. विखे पाटील यांनी आघाडीला सुरुंग लावण्याची रणनीती आखल्याचे समजते.
|