पोलिसांची अवस्था ना घर का, ना घाट का!

Police
Police

बदल्या होऊनही रिलीव्ह न केल्याने फरफट; चार महिन्यांपासून कुटुंबांचीही आबाळ
सातारा - वार्षिक सर्वसाधारण बदल्यांना चार महिने झाले तरीही पोलिसांना अद्याप मूळ ठिकाणाहून सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सहा वर्षे एका ठिकाणी सेवा बजावल्यानंतरही पोलिस दादाला बदलीच्या ठिकाणी जाता आलेले नाही. अनेकांनी बदलीच्या ठिकाणी कुटुंबाची व्यवस्था केल्यामुळे त्यांची फरफट होत आहे.

दरवर्षी मे महिन्यामध्ये पोलिसांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्या होतात. सहा वर्षे एका ठिकाणी सेवा केलेल्या पोलिसांचा यात प्रामुख्याने समावेश असतो. त्याचबरोबर विनंतीनुसारही काहींच्या बदल्या केल्या जातात. एप्रिल किंवा मे महिना हा बदल्यांचा कालावधी ठरवायलाही कारण आहे. जून महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू होत असतात. अनेकजण बदलीच्या ठिकाणीच मुलांना प्रवेश घेतात. त्यामुळे मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच बदलीचे ठिकाण कळावे व त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या राहण्याचे व शाळेचे नियोजन करता यावे, यासाठी या महिन्यांमध्ये बदली प्रक्रिया राबविली जाते. या वर्षी तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बदल्यांचे ‘गॅझेट’ केले. या बदल्या मे महिन्याच्या अखेरीस तसेच जून महिन्यामध्ये झाल्या. आधीच उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची बदलीच्या ठिकाणी जुळाजुळव करण्यात धावपळ उडाली होती. बदल्या झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी सोडणे आवश्‍यक असते. मात्र, बदल्यांचे आदेश झाल्यानंतर या ना त्या कारणाने पोलिसांवरील कामाचा ताण वाढत गेला.

श्री. पाटील यांनी प्रक्रिया केली. मात्र, पुढचे काम करण्यापूर्वीच संपूर्ण राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन भडकले. परभणी येथील ठिय्या आंदोलन सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्व राज्यात आंदोलनाचे लोण पसरले. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चानंतर काही आंदोलकांनी महामार्ग अडविला. या वेळी पोलिसांवर दगडफेक झाली.

त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच श्री. पाटील यांची बदली झाली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पदभार स्वीकारला तेव्हाही जिल्ह्यात आंदोलनाचे सावट होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्याही बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर डीजे वाजविण्यावरून दहीहंडी महोत्सवापासूनच जिल्ह्यातील वातावरण तापले. मराठा मोर्चा, पालखी बंदोबस्त व गणेशोत्सवातील तणाव यामुळे वरिष्ठांना बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना सोडले की नाही, याची माहिती घेण्याला वेळच मिळालेला दिसत नाही. आता नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे.

पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावे
पोलिसांवरील कामांच्या या व्यापात बदली झालेल्यांचे मात्र हाल सुरू आहेत. अनेकांनी लवकर सोडले जाईल, या आशेवर बदलीच्या ठिकाणी कुटुंबाची व्यवस्था केली आहे. काही करण्याच्या तयारीत होते. ते नियोजन बारगळले आहे. त्यामुळे अनेकांची फरफट सुरूच आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रकरणात लक्ष घालून चार महिन्यांपासून रखडलेले हे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com