डाळिंबाचा मार... कांद्याचा भार...

Pomegranate-Onion
Pomegranate-Onion

बिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर माणदेशातील हुकमी आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाचा मार शेतकऱ्यांना आता सोसवेनासा झाला आहे. 

डाळिंब फळबाग व कांदा लागणीतून आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे चुकीचे धोरण व नैसर्गिक आपत्तीमुळे वर्षानुवर्षे अपयश येत आहे. माल चांगला आणला तर दर मिळत नाही, तर दर असेल त्या वेळी निसर्गाची साथ मिळत नाही. अशा प्रकारामुळे फळबागा व कांदा लागवडधारक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे. डाळिंबाला सरासरी २५ रुपयांच्या आसपास तर कांद्याला चार ते पाच रुपयांचा दर मिळत असल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. 

शेतकरी नशीब, जिद्द, चिकाटी, श्रम व आत्मविश्‍वासाच्या जोरावर चांगला माल आणेलही. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मालाला हमीभाव मिळत नसल्याने तो कवडीमोल दराने विकावा लागत आहे. यासाठी डाळिंब व कांद्याला हमीभाव मिळणे गरजेचे आहे. शासनाने यावर विचार करून शेतकऱ्यांचे आर्थिकमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही शेतकरी वर्गातून केली जात आहे.

डाळिंब लागवडीपासून ते बहर धरून फळतोडीपर्यंत आपल्या लहान मुलांप्रमाणे त्या बागेचे संगोपन केले जाते. लाखो रूपये खर्च करून कधी विविध रोगांमुळे तर कधी दर गडगडल्याने फळे बांधावर फेकून द्यावी लागतात. यामुळे बहुतांश फळबाग लागवडधारकांनी डाळिंब काढून पेरू, आंबा, सीताफळ याकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड केली जात आहे. डाळिंबाप्रमाणेच कांद्याचीही अवस्था तीच झाली आहे. नासका माल म्हणून पाहिले जाणाऱ्या कांद्याचे पीक वेळेत गेले तर ठिक. नाहीतर बांधावर टाकून देण्याशिवाय कोणताच पर्याय शेतकऱ्यांकडे राहात नाही. हा माल खरेदी करताना दलालांमार्फत लुबाडण्याचे प्रकारही समोर येतात. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. एका रात्रीत कोट्यधीश करणारे पीक म्हणून डाळिंब व कांद्याकडे पाहिले जाते.

या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहराचे नियोजन केल्याने चांगली कळी लागून बहर यशस्वी झाला होता. मात्र पुन्हा दराने दगा दिल्याने १० रुपयांपासून चांगला माल २५ रुपयांपर्यंत कसातरी घालावा लागला.
- गणेश शिंदे, फळबाग शेतकरी, बिजवडी

कांद्याला या वर्षी दर मिळेल, पुढच्या वर्षी दर मिळेल या आशेवर आम्ही प्रत्येक वेळी कांद्याचे पीक घेत असतो. मात्र नेहमीच पडत्या दरामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कांद्याला हमीभाव दिला तर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल.
- शरद दळवी, कांदा उत्पादक, मलवडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com