आंबेडकरांच्या शाळेला मिळणार झळाळी! 

आंबेडकरांच्या शाळेला मिळणार झळाळी! 

सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला लागलेली घरघर थांबविण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. ही शाळा भरत असलेल्या जुन्या राजवाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने आठ कोटी 30 लाखांचा प्रस्ताव बनविला आहे. तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला असून, त्यावर तत्काळ निर्णय होणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी 1824 मध्ये स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला जुना राजवाडा बांधला. त्याला 194 वर्षे होत असून, हे वैभव आता पुरते मोडकळीस आले आहे. लाकडांच्या साह्याने बांधलेला हा वाडा आता पुरातत्त्व विभागाकडे असून, तो उपेक्षेचा बळी ठरू पाहात आहे. याच राजवाड्यात 1851 मध्ये सातारा हायस्कूल सुरू झाले. तेथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सात नोव्हेंबर 1904 रोजी भिवा रामजी आंबेकर या नावाने प्रवेश घेतला. 1904 पर्यंत पहिली ते चौथीपर्यंत या शाळेत त्यांनी ज्ञानाचा पाया भक्‍कम केला. पुढे ते या ज्ञानाच्या ताकदीने भारतरत्न बनले. त्यानंतरही ही शाळा लाखो "भिवां'ना ज्ञान देत भारताची भावी पिढी घडवत आहे. शतक महोत्सवात 1951 मध्ये या शाळेचे नाव "छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह हायस्कूल' असे करण्यात आले. सध्या ही शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालविली जात आहे. 

द्विशतकी वाटचाल करणाऱ्या जुन्या राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले. प्रतापसिंह हायस्कूल आता मात्र खूपच भयावह अवस्थेत सुरू आहे. राजवाड्याकडे अतिदुर्लक्ष होत असल्याने स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लाकडी खांब खराब झाले आहेत. या राजवाड्याला अगदी पूर्वीसारखे रूप देण्यासाठी जिल्हा परिषदेने आठ कोटी 30 लाखांचा आराखडा बनविला आहे. तो सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाकडे जूनमध्ये पाठविण्यात आला आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी त्यात लक्ष घालून तत्काळ मंजुरी देणे आवश्‍यक आहे. प्रवेशद्वार, दरवाजे, खिडक्‍या, फरशी, कौले, अंतर्गत गटार, भिंती आदींची दुरुस्ती करून लाकडांना पॉलिश करणे, रंगविणे, नक्षीकाम करणे यासाठी हा आराखडा बनविला आहे. 

"वारसास्थळ'ने निर्णय घ्यावा 
जुन्या राजवाड्यात 16 खोल्या असलेली एक मजली दगडी इमारत आहे. तिच्या भिंती अत्यंत चांगल्या असल्या तरी फरशी, दरवाजे, कौले आदी वस्तू खराब झाल्या आहेत. त्याची दुरुस्ती करून त्यामध्ये शाळा भरविण्यासाठी जिल्हा परिषदेने सेस फंडातून 22 लाखांची तरतूद केली आहे. मात्र, ही इमारत पुरातत्त्व विभागाकडे असल्याने तेथे दुरुस्ती करता आली नाही. वारसास्थळ जतन समितीचे अध्यक्ष दिलीप बंड यांनी याबाबत बैठकही घेतली होती. मात्र, त्या कामास अद्याप मंजुरी मिळाली नाही. श्री. बंड यांनी काही काळ सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या शाळेची जबाबदारी पेलली आहे. त्यामुळे त्यांनीही लवकर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. 

""प्रतापसिंह हायस्कूल सुरू असलेल्या जुन्या राजवाड्याची दुरुस्ती करण्यासाठी 8.30 कोटींचा आराखडा राज्य शासनाकडे सादर केला आहे. तो मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू.'' 
-डॉ. कैलास शिंदे,  मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com