या महापूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला प्रारंभ; जाहीरनामा प्रसिद्ध

Process started forrehabilitation of flood-affected villages in Sangali
Process started forrehabilitation of flood-affected villages in Sangali

इस्लामपूर, ता. 26 : वाळवा तालुक्‍यातील कणेगाव व भरतवाडी या दोन गावांच्या पुनर्वसनाचा भिजत पडलेला गेल्या 31 वर्षांपूर्वीचा प्रश्न आता मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासनस्तरावर तसा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. स्थानिक प्रशासनाचा पाठपुरावा आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पातळीवरून त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

कणेगाव आणि भरतवाडी ही गावे अगदी वारणा नदीच्या काठावर वसली आहेत. वारणा नदीच्या पाणी पातळीत थोडी जरी वाढ झाली तरी कणेगाव व भरतवाडीमधील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सन 1953, 1976, 1989, 2005 व अलिकडेच ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे गावकरी भयभीत झालेले आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.

या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सन 1989 साली शासनाने 9 हेक्‍टर 66 आर जमिनीचे संपादनसुद्धा केले होते. मात्र त्यावर रेखांकन करून भुखंड वाटपाची कार्यवाही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे झाली नाही. त्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अर्ज विनंत्या केल्या होत्या. मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. जुन 2017 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. विश्वासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयात उपोषणाला बसल्यावर तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सहा महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याचे दिलेले लेखी अश्वासनही रखडले होते.

ऑगस्ट 2019 मधील महापुरामुळे शासनाला जाग आली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी कणेगाव व भरतवाडीच्या पुनर्वसनासाठी 20 मार्चला आयोजित केलेली बैठक कोरोनामुळे रद्द झाली. तथापि प्रांताधिकारी व तहसीलदार यांना इस्लामपूर मध्ये मिटींग घेण्यासाठी सुचना केली. भुखंड मागणी अर्ज मागविण्याचे ठरवण्यात आले. परंतू कोरोनामुळे तीही प्रक्रिया थांबली होती. 

प्रक्रियेसाठी समिती स्थापन
मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार 15 जूनला प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत जाहिरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 19 जूनला पुनर्वसनासंदर्भात जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. 20 जून ते 19 जुलै 2020 या कालावधीत प्लॉट मागणी करण्यासाठी ग्रामसेवक कणेगाव यांचेकडे अर्ज करायचे आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून 17 ऑगस्ट 2020 रोजी लाभार्थींची अंतीम यादी प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेसाठी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, इस्लामपूर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, उपअभियंता पंचायत समिती, मंडल अधिकारी, ग्रामसेवक कणेगाव, तलाठी कणेगाव यांचा समावेश आहे. प्लॉटवाटपाची प्रक्रीया शासकीय पातळीवर पारदर्शकपणे पार पाडण्याची आशा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com