चांगल्या डॉक्‍टरांचे प्रमाण 70 टक्केच...मेरिट असलेल्या डॉक्‍टरांकडे रूग्ण दगावण्याची शक्‍यता कमी...चुका करणाऱ्या डॉक्‍टरांना जयंतरावांचा पुन्हा इशारा...सविस्तर वाचा 

jayant patil.jpg
jayant patil.jpg

इस्लामपूर (जि.सांगली)- कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्राचा कस पणाला लागला आहे, जे डॉक्‍टर मेरिटने आले आहेत, त्यांच्याकडे रुग्ण दगावण्याची शक्‍यता कमी असते. आपल्याकडे चांगल्या डॉक्‍टरांचे प्रमाण प्रमाण सत्तर टक्के आहे, असे वक्तव्य जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. काही डॉक्‍टर उपचारात हेळसांड करीत रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. भरमसाठ बिले करीत आहेत. माझ्याकडे तशा काही तक्रारी आल्याने मी डॉक्‍टरांचे उपचार व बिलांचे ऑडीट करण्याबाबत बोललो. तशी व्यवस्था उभा केली. कोविडच्या संकटकाळात कोण चुकीचे वागत असेल तर खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

ते म्हणाले, "कोरोनाच्या संकटकाळात बहुतेक डॉक्‍टर चांगली सेवा देत आहेत. मात्र काही थोडे डॉक्‍टर उपचारात हेळसांड करत असून भरमसाठ बिले करतात. अशा डॉक्‍टरांना कोणी तरी विचारायला नको का? जिथे सरकारी व्यवस्था आहे, तिथे गोरगरीब, सामान्य कुटुंबातील रुग्णांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एचआरसीटी टेस्टसाठी साडेपाच ते सहा हजार घेतले जात होते. त्यावर सरकारने नियंत्रण आणले आहे. 16 साईजच्या मशीनसाठी 2 हजार, 16 ते 64 साईजच्या मशीनसाठी 2 हजार 500,तर 64 साईजच्यावरील मशीन साठी 3 हजाराचा दर निश्‍चित केला आहे. आता औषधांच्या काळाबाजारावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""काही दिवसापूर्वी बेड आणि ऑक्‍सिजन तुटवडा हे गंभीर प्रश्न होते; मात्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र 4 हजार 622 बेडची व्यवस्था केली आहे. तसेच बऱ्याच प्रयत्नानंतर जिल्ह्यासाठी 11 टनांच्या ऑक्‍सिजन टॅंकरची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलांना त्यांच्या कडे किती बेड आहेत? किती रुग्ण उपचार घेत आहेत,आणि किती बेड शिल्लक आहेत, याची पाटी हॉस्पिटलबाहेर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आमच्याकडे बेड नाहीत, ही सबब चालणार नाही'' 
यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते 

टास्क फोर्सच्या तज्ज्ञांकडून आढावा- 
राज्याच्या कोविड रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागात सरकारच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी आठवड्यातून किमान एकदा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे तेथील प्रश्न घ्यायला हवेत, अशी मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांची सांगली जिल्ह्यातील डॉक्‍टरांशी व्हीडीओ कॉन्फरन्स घडवून आणली आहे. त्यांनी सांगली जिल्ह्यातील डॉक्‍टरांना कोणत्या स्थितीत कोणते औषध द्यायचे आदी सविस्तर मार्गदर्शन केले आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com