चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या...

चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या...

कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर आव्हान दिले. चंद्रकांत पाटील यांच्यात हिंमत असेल तर मंत्रालयाच्या चौकात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांशी शेतकरी आणि दुष्काळाबाबत चर्चा करण्याचे आव्हानही महिला पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पंटर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा या वेळी निषेधही करण्यात आला.

राज्यातील दुष्काळाबाबत भाजप सरकारने काय केले, हे सांगायला आम्ही तयार आहोत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पंटरांनी राज्यातील कोणत्याही चौकात यावे, त्यांच्याशी मी चर्चेला तयार आहे, असे आव्हान श्री. चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. ते आव्हान स्वीकारून ताराराणी चौकात येऊनच या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना चौकात येण्याचे आव्हान केले.

राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे म्हणाल्या, ‘‘चंद्रकांत पाटील यांचे जाहीर आव्हान आम्ही स्वीकारून येथे आलो. त्यांनी आपल्या वक्तव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘पंटर’ म्हटले आहे. याचा आम्ही निषेध करतो. दोन दिवसांपूर्वी आम्ही आव्हान स्वीकारले; पण चंद्रकांत पाटील यांनी त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही. ताराराणी यांनी ज्याप्रमाणे आपली तलवार बाहेर काढली आहे, त्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या वक्तव्याविरुद्ध तलवार बाहेर काढली आहे.

एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यभर फिरून दुष्काळाची माहिती घेत दुष्काळग्रस्तांना दिलासा देत आहेत. या उलट मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ वातानुकूलित कार्यालयात बसून आश्‍वासन देत आहेत. शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांना तूटपुंजी मदत केली जात आहे. दुष्काळामध्ये असणाऱ्या जनावरांना दैनंदिन ९० रुपयांचा खुराक पुरेसा नाही. आठवड्यातून केवळ तीन किलोची पेंड दिली जाते. मोठ्या जनावरांना एक किलो आणि छोट्या जनावरांना अर्धा किलो पेंड दिली पाहिजे.’’ 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या, ‘‘भाजपचा पोपटपंची कारभार सुरू आहे. दुष्काळ असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्‍न केवळ घोषणाबाजी करणे, एवढेच त्यांना जमते.’’

सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा कविता म्हेत्रे म्हणाल्या, ‘‘चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आव्हान स्वीकारल्यानंतर ते कोल्हापुरात नाहीत, असे सांगितले जात आहे. याच अर्थ आव्हान देऊन चंद्रकांत पाटील यांनी पळवाट काढली आहे. दुष्काळावर चर्चा करतो, ही केवळ त्यांची घोषणा आहे. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवायचे नाही तर पेटवायचे आहेत.’’

यावेळी, अर्चना गोरे (पुणे), लोचन शेळके (शिरूर), वैशाली धगाटे (दौंड), जहिदा मुजावर, अमृता कांबळे उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौक ते जुन्या शासकीय विश्रामगृहापर्यंत चंद्रकांत पाटील आणि भाजपविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. श्री. पाटील यांचे शासकीय स्वीय सहायक बाळासाहेब यादव यांना निवेदन दिले.

दुष्काळमुक्त गावे दाखवाच..
जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील २५ हजार गावे दुष्काळमुक्त केल्याचे भाजप सरकारकडून सांगितले जाते; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही गावे आम्हाला दाखवावीत, असे जाहीर आव्हानही सौ. नागवडे यांनी यावेळी केले. 

महसूलमंत्र्यांवर टीका
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आव्हान स्वीकारल्यानंतरही मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापुरात थांबलेले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी पळपुटेपणा दाखवून दिल्याची टीका महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com