माझे नाव आठवले तरी युतीवाले मला विसरले

माझे नाव आठवले तरी युतीवाले मला विसरले

कोल्हापूर -  राज्यात भाजप शिवसेनेची युती झाली मात्र या युतीत आमच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही. माझे नाव आठवले पण युतीवाले मला विसरले, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.  

श्री. आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. आठवले म्हणाले, भाजप शिवसेनेला मी सोडलेले नाही याचा अर्थ त्यांनी मला सोडावे असे नाही. राज्यात आम्हाला एकतरी जागा सोडावी. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. जागा न सोडल्यास मतांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. युतीची सत्ता राहावी अशी आपली इच्छा आहे. मात्र जागा न सोडल्यास सत्ताही राहणार नाही, असा इशाराही आठवले यांनी दिला. 

श्री. आठवले म्हणाले, गेल्या पाच वर्षातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांचा धडाका लावला. यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही. त्यामुळे ते पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. काँग्रेसचे राहूल गांघी यांची पंतप्रधान होण्याची अद्याप क्षमता नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूकीनंतर आधी विरोधी पक्षनेता होण्याचा अनुभव घ्यावा. काँग्रेसच्या जागा साठ ते सत्तरच्या पुढे जाणार नाहीत. याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे.

शिवसेना राहूल शेवाळे यांच्यासाठी आग्रही आहे. केवळ मुंबईच नव्हे तर देशात काँग्रेसला रोखायचे असल्यास ज्या ज्या राज्यात आमची ताकद आहे तेथे जागा द्या अशी मागणी आहे. उत्तर प्रदेशमध्ये बसपाला रोखायचे असेल तर आम्हाला जागा द्यावी लागेल. आसाममध्येही एका जागेसाठी आग्रही आहोत, असेही श्री. आठवले यांनी सांगितले. 

मुंबईतील जागेसंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी जागा सोडावी. दक्षिण मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई जागेचा तर विचार करावा. भीमशक्ती-शिवशक्ती एकत्रित यावी असे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ते पूर्ण व्हायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. भाजप अथवा शिवसेना कुणाच्या कोट्यातील जागा द्यावीच लागेल, असे श्री आठवले म्हणाले.  

युपीए विरूद्ध एनडीए असा सामना रंगणार असल्याचे सांगून आठवले म्हणाले, 90 कोटी मतदार मोदींच्या बाजूने कौल देतील. भाजप हा सर्व जाती धर्मांचा पक्ष झाला आहे. मोदींवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही. राफेल विमान खरेदीची किंमत 17.8 टक्‍यांनी कमी होती असा अहवाल आला आहे. मोदींनी संविधानाला धक्का लावलेला नाही. आरक्षणही अबाधित राहिल. सवर्णांना दहा टक्के आरक्षणासाठी मी आग्रही होतो तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला, आरक्षणामुळे सवर्ण आणि दलितांमधील दरी कमी झाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com