रोपळे बुद्रुक - राजू शेट्टी यांनी योग्य निर्णय घेतला आहे; परंतु हा निर्णय त्यांनी खूप उशिरा घेतला, तो आगोदरच घ्यायला हवा होता. आमचे जुने सहकारी बाजूला गेलेले जवळ आले याचा आनंद झाला, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी रोपळे (ता. पंढरपूर) येथील शेतकरी गावभेट दौऱ्यात व्यक्त केली.
शेतकऱ्यांना उसाला पहिला हप्ता 3 हजार 500 रुपये मिळावा यासाठी पंढरपूर येथे 6 सप्टेंबरला ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऊस परिषदेनिमित्त संपूर्ण राज्यात सध्या रघुनाथदादा पाटील गावभेट दौरे करत आहेत. पाटील म्हणाले, ""ऊस परिषदेत शेतकऱ्यांना उसाला पहिला हफ्ता 3 हजार 500 रुपये मिळाला पाहिजे. अन्यथा, कारखान्यांना आम्ही ऊस घालणार नाही. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऊस परिषदेला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे.
|