‘लाखमोला’च्या महामार्ग शाखेकडे १९ जणांचे डोळे

‘लाखमोला’च्या महामार्ग शाखेकडे १९ जणांचे डोळे

कोल्हापूर - महामार्ग वाहतूक शाखेकडे बदली झालेल्या १९ पोलिसांना कार्यमुक्तीचे वेध लागले आहेत. कधी एकदा कार्यमुक्तीची ऑर्डर निघते, अशी हुरहुर त्यांना लागली आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र त्यांना रेड सिग्नल दिला आहे. महामार्ग वाहतूक शाखेकडेच त्यांचा ओढा का? यासह पडद्यामागील अनेक कारणे आहेत. त्याचीही चर्चा पोलिस खात्यातच सुरू आहे. प्रत्यक्षात मुंबईतील ‘सिस्टीम’मधून १९ पोलिस असल्यामुळेच मुद्दाम तत्कालीन अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नसल्याचे सांगण्यात येते. 

पोलिसांच्या बदल्या हा एक चर्चेचा विषय असतो. पोलिस मुख्यालय ते लाभाच्या पदापर्यंत अनेक ठिकाणी ‘फिल्डिंग’ लावली जाते. नेत्यांपासून मुंबईतील वरिष्ठांपर्यंत अनेकांनी वशिले लावलेले असतात. नियुक्‍ती पोलिस ठाण्यात असेल, तर तेथे एखाद्या गुन्ह्याचा तपास करावा लागतो. त्याची कागदपत्रे तयार करावी लागतात. चोवीस तासांत केव्हाही, कितीही तास ड्यूटी करावी लागते. यातून थोडा आराम आणि हक्काचे, लाभाचे ठिकाण म्हणून वाहतूक शाखेकडील नेमणुकीला अनेकांकडून पसंती दिली जाते. त्यामध्ये महामार्ग पोलिस असेल तर ‘सोन्याहून पिवळे’ समजले जाते. अशाच महामार्ग पोलिस विभागाकडे काही महिन्यांपूर्वी १९ जणांची नियुक्ती झाली आहे. प्रशासकीय पातळीवर त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या असलेले तपास आणि कार्यमुक्त करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केलेली नाही. त्यामुळेच त्यांना कार्यमुक्त केले नसल्याचे प्रशासकीय पातळीवर सांगितले जाते.

प्रत्यक्षात महामार्ग पोलिस म्हणजे ‘समुद्रात पाऊस’ अशी नेमणूक पोलिस खात्यात समजली जाते. तेथे जाण्यासाठी काहींनी थेट मुंबईतून ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्नातून ‘लाखमोलाची’ नेमणूक त्यांनी मिळविली आहे. त्याचा ‘लाभ’ मुंबईतपर्यंत झाला. तरीही त्यांना अद्याप नेमणूक मिळालेली नाही. त्यामुळे सर्व पोलिस सध्या वाहतूक शाखेकडे जाण्यासाठी डोळे लावून बसले आहेत. गुन्ह्यात तपासाची किटकिट नसते. यामुळे १९ पोलिसांनी महामार्ग पोलिस शाखेत नियुक्तीसाठी फारच ‘कष्ट’ घेतले आहे, मात्र त्यांना कार्यमुक्त केले नाही म्हणून आता त्यांची गोची झाली आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी त्यांना रोखून धरले होते. आता पुन्हा कार्यमुक्‍तीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. तेथे काय घडते आणि काय नाही, याची चर्चा शहरासह जिल्ह्यातील पोलिसांत सुरू आहे. मुंबईतील वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केल्यामुळे येथे असेच होणार असेही काहींकडून सांगण्यात येते.
 

राज्यांच्या सीमेवर कसून ‘तपास’ 
कोल्हापूर जिल्ह्याला सीमाभाग आहे. कर्नाटक व गोव्याची सीमा आहे. महामार्गावर तर कर्नाटक-महाराष्ट्र या सीमेवरून रोज हजारो अवजड वाहनांची ये-जा होते. आजही रोज सकाळी दहा ते दुपारी दीड आणि चार ते रात्री दहापर्यंत एका पेट्रोप पंपासमोर प्रत्येक वाहन ‘तपासून’च सोडले जाते. विशेष करून कर्नाटकातील बहुतांशी अवजड वाहनांसाठी हा ‘स्पॉट’ म्हणजे ‘आरओटी चेकपोस्ट’ला समांतर मानला जात आहे. नुकत्याच आलेल्या अधिकाऱ्याने  स्वतःच कसून ‘तपास’ सुरू केला आहे. यामुळे अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com