15 मे रोजी सुनावणी; सरकार पक्षावर न्यायालयाची नाराजी
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील पहिला संशयित समीर गायकवाड याचा तिसरा जामीन अर्ज आज त्याच्या वकिलांनी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात दाखल केला. त्यावर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे.
सरकार पक्षातर्फे न्यायालयात कोणीच हजर नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
गायकवाडला 16 सप्टेंबर 2015 ला अटक झाली. जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या कोर्टात आज गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी त्याचा तिसरा जामीन अर्ज आज दाखल केला. दुसरा जामीन अर्ज रद्द करून एक वर्ष एक महिना उलटून गेला आहे. तरी तपास सुरू आहे. तपासाला आमचा कोणताही विरोध नाही. आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत समीर आरोपी होत नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळावा, अशी मागणी केली. न्यायाधीश बिले यांनी यावर 15 मे रोजी सुनावणी ठेवली आहे.
सुनावणी वेळी आज मुख्य तपासी अधिकारी उपस्थित नव्हते. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीबद्दल आक्षेप घेतल्याने तेही न्यायालयात आले नाहीत, तसेच सरकार पक्षातर्फे अन्य वकीलही न्यायालयात उपस्थित नव्हते. याबद्दल न्यायाधीश बिले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऍड. शुक्ल न्यायालयात हजर झाले. त्यांनी हा खटला संवेदनशील असून, त्याबाबत आयत्या वेळी बाजू मांडणे शक्य नाही. त्यासाठी थोडा अवधी द्या, अशी मागणी केली.
तपास अधिकाऱ्यांमार्फत विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीबाबत न्यायालयात अर्ज सादर झाला. त्यात राणे यांची नियुक्ती शासनाच्या 2015 च्या अध्यादेशानुसार झाली आहे. तसेच सुधारित 2016 च्या अध्यादेशानुसार गृह विभागाकडे कागदोपत्री परवानगीबाबतचाही पत्रव्यवहार केला असल्याचे त्या अर्जात म्हटले आहे. त्यावरही 15 मे रोजी सुनावणी होणार असल्याचे शुक्ल यांनी सांगितले.
|