सांगली : ब्रम्हनाळमध्ये नाव उलटली; नऊ जणांचा मृत्यू

सांगली : ब्रम्हनाळमध्ये नाव उलटली; नऊ जणांचा मृत्यू

पलूस - कृष्णा नदीच्या महाप्रलयंकारी महापुराचे पाणी घरात घुसल्यानंतर ब्रह्मनाळच्या लोकांनी जीव मुठीत घेऊन गाव सोडले. जीव वाचावा म्हणून ते बोटीतून निघाले; मात्र काळाने बोटीतच त्यांच्यावर घाला घातला. महापुरातून सुटकेचे अंतर अवघ्या वीस मीटरवर असताना बोट बुडाली आणि तब्बल नऊ लोकांना जलसमाधी मिळाली. अद्याप पाच जण बेपत्ता असून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता आहे. पंधरा जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेने जिल्हा हादरून गेला असून नातेवाईकांचा आक्रोश जीव पिळवटून सोडणारा होता. 

आज सकाळी नऊ वाजता ब्रह्मनाळ-खटाव रस्त्यावर खटावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. बाबासाहेब अण्णा पाटील, मनिषा दीपक पाटील, राजमती जयपाल चौगुले, कस्तुरी बाळू वडेर, सुवर्णा तानाजी गडदे, अश्‍विनी मारुती नरुटे, कल्पना रवींद्र कारंडे, वर्षा भाऊसाहेब पाटील, सौरभ तानाजी गडदे, भास्कर बंडगर, गंगव्वा सरगर, क्षिती दीपक पाटील, वृषभनाथ जीवंधर चौगुले, बाळासाहेब भूपाल वडेर, रेखा शंकर वावरे हे बुडाले. त्यातील नऊजणांचे मृतदेह हाती लागले असून पाचजण बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोध सुरू होता. मृतात ६ महिन्यांच्या बाळासह ७ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 

पलूस तालुक्‍यातील ब्रह्मनाळ गावाला पुराचा वेडा पडला आहे. गावात पाणी शिरले आहे. इतके पाणी येणार नाही, धोका होणार नाही, या विश्‍वासने लोकांनी घर सोडले नाही, पण यंदा सन २००५ च्या महापुराचा विक्रम मोडला गेला. कृष्णाकाठी महाप्रलय आला. त्याचा फटका ब्रह्मनाळलाही बसला. तेथे घरात रहायला जागा उरली नाही. समोर मृत्यू दिसू लागला.

पाणी कमी व्हायचे लक्षण दिसेना, पाऊस थांबेना, त्यातून वाचण्यासाठी गाव सोडले पाहिजे, या विचाराने ब्रह्मनाळच्या लोकांनी कालपासून धावपळ सुरू केली. प्रशासनाकडून मदत येईपर्यंत बुडून जावू, या भीतीने लोकांना ग्रासले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या बोटीतून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्याची तयारी केली. शेजारील खटाव गावात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

लाकडी बोट घेतली
जुनी लाकडी बोट तयार करण्यात आली, मात्र दुर्दैवाने त्या बोटीत तब्बल तीस लोक बसले. बोट जुनी होती, शिवाय तिची क्षमता पंधरा ते सतरा लोक बसतील इतकीच होती. पण, खूप संख्येने महिला असल्याने कुणाला थांबवणे कठीण झाले असावे, असे बोटीत बसतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून स्पष्ट होते. बोट भरली तेव्हाच ती ओव्हरलोड झाल्याचे स्पष्ट दिसत होते. धोका आहे, याची कल्पनाही येत होती. ही बोट लोकांना घेऊन खटावच्या दिशेने गेली. तेथे नियोजित जागी ते खाली उतरणार होते. तेथून अवघ्या वीस मीटर अंतरावरच मोटारबोटीचा काही भाग काटेरी झुडपात अडकला. त्यामुळे लोक घाबरले. महिलांची हालचाल झाली आणि क्षणात बोट पलटी झाली, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. क्षणात सारे बुडाले. काठावरून तरुणांनी पटापट उड्या टाकून शक्‍य त्याला वाचवले. चौदाजण बुडाले. क्षणापूर्वी ज्यांना बोटीत बसवले त्यांचेच मृतदेह बाहेर काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. त्यांचे डोळे पाणावले. लोकांनी टाहो फोडला. 

ही घटना समोर आल्यानंतर तातडीने प्रशासनाकडून मदत पाठवण्यात आली, मात्र तोवर उशीर झाला होता. चौदा लोकांना जीवाला मुकावे लागले असल्याची शक्‍यता आहे. नऊ जणांचे मृतदेह हाती लागले असून अद्याप पाचजण बेपत्ता आहेत. या घटनेने संपूर्ण पलूस तालुक्‍यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 

दरम्यान, आमदार विश्‍वजित कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत केली. एनडीआरएफ च्या दुपारी दोन वाजता दाखल झालेल्या बोटीही बंद अवस्थेत असल्याचे समोर आल्याने लोकांनी निषेध केला.

बालकाचा अंत हेलावून सोडणारा
या साऱ्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका सहा महिन्याच्या बाळाला घेऊन एक महिला बोटीत बसली होती. तिने बाळाला कवटाळले होते, मात्र ती त्याला वाचवू शकली नाही. त्यांना बाहेर काढले तेव्हा ती बाळाला कवटाळूनच बसलेली होती. या अपघातातून त्या बाळाची आई बचावली, मात्र बाळाच्या दुर्दैवी मृत्यूने सारेच हळहळले. 

खरंच उशीर झाला...
वेळीच बाहेर पडले पाहिजे, यासाठी लोक आवाहन करत राहिले. पण, लोकांना विश्‍वास होता, पाणी आपल्या गावी येणार नाही. कृष्णाकाठच्या अनेक गावांसारखीच स्थिती ब्रह्मनाळची होती. अखेर पाणी गावात शिरले आणि बाहेर पडले पाहिजे, याची जाणीव झाली. तोवर उशीर झाला होता. 

जिल्हा हादरला
सन २००५ मध्येही सांगलीने महाप्रलय पाहिला होता. त्याला तोंड दिले होते, मात्र यंदाचा प्रलय लोकांची सत्वपरीक्षा पाहणारा आहे. ब्रह्मनाळच्या घटनेने तर जिल्हा हादरून गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com