सांगली बंधाऱ्याचा श्वास कोंडला

दहा वर्षांहून अधिक काळ वाळू उपसा बंद
कृष्णा नदीतील कोल्हापूर पद्धतीच्या सांगली बंधाऱ्यात गळ्यापर्यंत वाळू साचली आहे.
कृष्णा नदीतील कोल्हापूर पद्धतीच्या सांगली बंधाऱ्यात गळ्यापर्यंत वाळू साचली आहे. sakal

सांगली : कृष्णा नदीतील कोल्हापूर पद्धतीच्या सांगली बंधाऱ्यात गळ्यापर्यंत वाळू साचली आहे. परिणामी, या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता निम्म्याहून कमी झाली आहे. हरित लवादाने यांत्रिक पद्धतीने नद्यांतील वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. परिणामी वाळू उपसा करण्यात अडचणी आहेत. मात्र सांगलीसह नदीकाठच्या शहर व गावांतील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता यावर तोडगा काढावा लागेल. हरित लवादाची विशेष परवानगी घेऊन या वाळू उपशाबाबत धोरण ठरवावे लागेल.

हरित लवादाने राज्यातील नद्यांतून वाळू उपशाला बंदी घातली आहे. यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा करता येणार नाही. त्यामुळे दहा वर्षांहून अधिक काळापासून वाळू उपसा बंद आहे. परिणामी, किमान वाळूसाठी तरी नदीची लक्तरे तोडण्याचे कमी झाले आहे. ‘कृष्णा’ ही बारमाही आहे. नदीच्या मार्गात ७ उपबंधारे, २ बॅरेज आहेत. त्यांना दरवाजे आहेत. दरवाजे उघडल्यानंतर त्या पातळीपासूनची माती, वाळू वाहून जाते. मात्र, त्याखालील बाजूला वर्षानुवर्षे वाळू साठत आली आहे. परिणामी, बंधाऱ्यांची साठवण क्षमता निम्‍म्याहून कमी झाली आहे. या स्थितीत बंधाऱ्यांचा श्‍वास मोकळा करणे गरजचे आहे. पाणी साठवण क्षमता वाढवणे गरजेचे असल्याने पाटबंधारे विभाग, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने त्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.

हरित लवादाचा निकाल वाळूच्या यांत्रिक पद्धतीने उपशाविरुद्ध आहे. बंधाऱ्यात साचलेली वाळू सांगलीसह अनेक गावांच्या पाणीसाठ्यासाठी अडचणीची ठरत असेल, तर ती हरित लवादाच्या मान्यतेने उचलली पाहिजे, भले ती उपसून बंधाऱ्याच्या पलिकडे हरिपूरच्या बाजूला टाका; पण ‘कृष्णे’तील पाणीसाठवण क्षमता वाढवा.

- सतीश साखळकर, नागरिक विकास मंच

बंधाऱ्याचे बरगे काढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला; बंधाराच काढला तर काय अवस्था होईल? या स्थितीला ‘पाटबंधारे’ जबाबदार आहे की महापालिका, या तांत्रिक मुद्द्यात सांगलीकरांना रस नाही. या दोन्ही व्यवस्था राज्य शासनाच्या आहेत. त्यांनी नागरिकांच्या हिताचा विचार करावा. संकट वाढवण्यापेक्षा शाश्‍वत उपायांवर बोला, आम्ही तुमच्या सोबत उभे राहू.

- पृथ्वीराज पवार, निमंत्रक, बंधारा बचाव, आंदोलन

बंधाऱ्यात गळ्यापर्यंत वाळू साचल्याने तेथील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. वाळू उपसा करायचा किंवा कसे, याबाबत धोरण ठरवावे लागेल.

- ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे

परिणाम काय?

जूनच्या प्रारंभी कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढले जातात. गाळ, माती वाहून जावी, यासाठी हे बरगे काढले जातात. ते पावसाळा संपताना पुन्हा लावले जातात. बरगे काढल्यानंतर पाऊसकाळ लांबला तर नदीतील पाणीसाठा अत्यंत मर्यादित राहतो. त्यात बहुतांश वाळूसाठाच असल्याने पाणी कमी आहे. पुन्हा धरणातून पाणी सोडले तरी ते बंधाऱ्यातून वाहूनच जाणार आहे. त्यामुळे वाळू उपसा करून पाण्याची साठवण क्षमता पूर्ववत करणे गरजेचे आहे; अन्यथा, पाऊसकाळ लांबेल, तशी समस्या वाढू शकते.

सांगली बंधाऱ्याची

स्थिती आकड्यांमध्ये

पाणी साठवण क्षमता - ५०.६२ दशलक्ष घनफूट

मृत साठा - ०.३७ दशलक्ष घनफूट

सांडव्याची एकूण लांबी - १९३.५० मीटर

दरवाजांची संख्या - ६२ गाळे, १.८३ मीटर

बंधाऱ्याची उंची - ३.४० मीटर

साठवलेल्या पाण्याची उंची - ३.४० मीटर

बंधारा लाभक्षेत्रातील गावे - सांगली, सांगलीवाडी,

कसबे डिग्रज, समडोळी, पद्माळे, कर्नाळ, बुधगाव,

कवलापूर, रसूलवाडी, सांबरवाडी, कुपवाड, माधवनगर,

मौजे डिग्रज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com