सांगली : निर्यातक्षम द्राक्षे बेदाणा शेडवर

रास्त दर मिळण्याची उत्पादकांची अपेक्षा
bedana.jpg
bedana.jpgsakal

मिरज: सांगली जिल्ह्यातून जगभर पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे यावर्षी केवळ नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक मंदीमुळे बेदाण्याच्या शेडवर चालली आहेत. निर्यातक्षम द्राक्षापासूनचा हजारो टन उच्च प्रतीचा बेदाणा आगामी काळात बाजारपेठेत येणार आहे. किमान या बेदाण्यास तरी रास्त दर मिळावा एवढीच द्राक्ष उत्पादकाची किमान अपेक्षा आहे.

गेल्या सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक विविध संकटांचा सामना करत आहे. त्यातच प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र जिल्ह्यात वाढत आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पट ते चौपट दराने परदेशांमध्ये द्राक्षांना दर मिळेल, या अपेक्षेने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यासाठी प्रचंड कष्ट घेऊन कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यावर्षी अवकाळी पाऊस आणि अति थंडीमुळे आगाप छाटणीच्या द्राक्षांना फटका बसला. अति थंडीमुळे द्राक्षात गोडवा निर्माण झाला नाही आणि निर्यातक्षम म्हणून परदेशात पाठवलेली द्राक्षेही प्रवासात फुटल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. याशिवाय स्थानिक देशांतर्गत असलेल्या लांब पल्ल्याच्या बाजारपेठांमध्येही ही द्राक्षे जाऊ शकली नाहीत. त्यामुळेही व्यापाऱ्यांनी द्राक्ष उत्पादकांकडे पाठ फिरवली. सध्या तर निर्यातक्षम द्राक्षांचे दर चार किलोच्या पेटीस ९० ते १२० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ज्यामध्ये द्राक्षांसाठीचा खर्चही भागत नसल्याने शेत द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सोसायटी, बँकाची कर्जे आणि औषध व्यापाऱ्यांची थकबाकी यामध्येही हजारो द्राक्ष उत्पादक अडकून पडले आहेत. संपूर्ण सांगली जिल्ह्यात लाखो हेक्टर क्षेत्रातील निर्यातक्षम द्राक्षापासूनच्या चांगल्या बेदाण्यास तरी किमान चांगला दर मिळेल, या भाबड्या अपेक्षेने ही निर्यातक्षम द्राक्षे बेदाणा शेडकडे चालली आहेत.

निर्यातक्षम द्राक्षांची बेदाणा करण्याची शेतकऱ्यांवर आलेली ही वेळ द्राक्ष शेतीतील शेतकऱ्यांसाठी एक मोठा धक्का आहे. त्यामुळे भविष्यात या द्राक्ष शेतीचेही अभ्यासपूर्ण नियोजन करण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

जादा उत्पन्नाच्या अपेक्षेने सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र वाढत आहे. त्यासाठीचा खर्चही कित्येक पटीने वाढत आहे. उच्च दर्जाच्या उत्पन्नाचा सल्ला देणारे सल्लागारही गावोगावी तयार झाले आहेत; परंतु यासाठीच्या यावर्षी नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक घडामोडींमुळे या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाल्याने त्याचा मोठा फटका निर्यातक्षम द्राक्षे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बसला.

- सुभाष आरवे, ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक, कार्वे (ता. विटा)

गेल्या तीन वर्षांतील सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे निर्यातक्षम द्राक्षाचा दर्जा खालावला आहे. यापूर्वी पाठवलेली द्राक्षे परदेशांमध्ये नाकारली गेल्याने आगामी काळात अशा पद्धतीने द्राक्षे पाठवणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे यावर्षी निर्यात ५० टक्क्यांनी घटली आहे.

- शफीभाई बागवान, चांद फ्रूट कंपनी, मिरज

जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत आहे. या द्राक्षांची परदेशात पाठवणी ही अत्यंत चिकित्सकपणे केली जाते. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचा दर्जा खालावल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे निकषांना पात्र ठरली नाहीत. त्यामुळे द्राक्ष निर्यात पूर्णपणे घटली आहे.

- प्रकाश नागरगोजे, जिल्हा कृषी अधिकारी (निर्यात), सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com