अजून किती शेतकऱ्यांची फसवणूक होणार?

अजून किती शेतकऱ्यांची फसवणूक होणार?

तासगाव - तालुक्‍यातील मणेराजुरी परिसरातील शेतकऱ्यांची यंदा पुन्हा ५० लाखांची फसवणूक झाल्याने हे फसवणुकीचे सत्र थांबणार कधी, हा प्रश्‍न उभा राहिला आहे. दरवर्षी कोट्यवधींची फसवणूक होते आणि दरवर्षी केवळ त्यावर चर्चा होतात ! फसवणूक झालेला शेतकरी कर्जबाजारी होऊन डोक्‍याला हात लावून बसतो. हे अजून किती दिवस चालणार? यावर काही उपाय आहे की नाही, असा सवाल आता शेतकरी विचारू लागले आहेत. 

तासगाव हा द्राक्षांचा तालुका ! दरवर्षी जानेवारी ते एप्रिल हे चार महिने शेतकऱ्यांच्या सुगीचे दिवस. वर्षभर राबून, डोळ्यांत तेल घालून, दिवसरात्र एक करून पिकविलेल्या द्राक्षांची विक्री करून गोड घास खायचा, असा विचार ‘आभाळा’कडे तोंड करूनच द्राक्षबागातयदार करीत असतो. कारण कधी हवामानाचा मूड बदलेल, हे सांगता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर द्राक्षाला विक्रमी दर मिळाल्याच्या आणि विक्रमी पीक घेतल्याच्या बातम्या येतात. मिळणाऱ्या उत्पन्नाची चर्चा जशी होते, तशीच चर्चा दरवर्षी द्राक्षबागातयदारांच्या फसवणुकीचीही होते.

यंदाच्या हंगामात फसवणुकीचा पहिला बळी मणेराजुरीचे शेतकरी ठरले आहेत. गेल्या वर्षीही या गावातील द्राक्ष बागायतदारांना दिल्ली परिसरातील दलालांनी गंडा घातला होता. याही वर्षी दिल्लीतीलच दलालांनी गंडा घातला आहे. फक्‍त शेतकरी आणि दलाल बदलले आहेत. फसवणुकीची पद्धत तीच ! सुरवातीला रोखीने द्राक्ष खरेदी करून विश्‍वास संपादन करून द्राक्षे उचलायची आणि ‘आलोच’ म्हणून पळून जायचे.

आता झालेल्या फसवणुकीतील शेतकऱ्यांना दीड-दोन लाख रुपयांपासून पाच लाखांपर्यंतची द्राक्षे खरेदी करून हे दलाल पळून गेले आहेत. दरवर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चार-पाच कोटी रुपयांचा फटका बसतो. द्राक्ष हे अत्यंत नाजूक फळ असल्याने त्याला वेळेवर ग्राहक मिळणे आवश्‍यक असते. त्यामुळे शेतकरी गडबड करीत असतात. शेतकरीच दलाल शोधत फिरत असतात. याचा पद्धतशीर फायदा वर्षानुवर्षे हे दलाल घेत आहेत. याच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

कोणतेही सरकारी खाते याची जबाबदारी घेत नाही. तुम्ही पिकविलेल्या द्राक्षाला तुम्हीच जबाबदार ! म्हणून वाऱ्यावर सोडलेला द्राक्षबागायतदार अक्षरशः दरवर्षी नागवला जातोय. हतबल झालेला शेतकरी दलालाच्या शोधात गेल्यास कुठेच सापडत नाही आणि सापडलाच तर त्या भागातील पोलिस सहकार्य करीत नाहीत. उलट या शेतकऱ्यांवरच अपहरण व मारहाणीसारखे गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

उपाययोजना अंमलबजावणीविना 
या पार्श्‍वभूमीवर ५० लाखांच्या फसवणुकीनंतर घ्यावयाच्या काळजीची चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी विश्‍वासू दलालाला द्राक्षे द्यावीत, दलालाकडे आधारकार्डासारखे पुरावे मागावेत, दलालांची नोंदणी पोलिस ठाण्याकडे करावी वगैरे उपाययोजना सुचविल्या आहेत. यावर्षी तर गावच्या पोलिसपाटलांनी ही माहिती पोलिसांना द्यावी, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. पण, त्याची अंमलबजावणी कोण करणार? त्याची काळजी शेतकरीही घेत नाहीत, सरकारी यंत्रणेचा तर प्रश्‍नच नाही. त्याचा याच्याशी काही संबंधच नाही. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याप्रमाणे दरवर्षी फसवणुकीचे प्रकार घडतच राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com