लोकमान्यांवरील खटल्याच्या खर्चात सांगली जिल्‍ह्याचाही वाटा

लोकमान्यांवरील खटल्याच्या खर्चात सांगली जिल्‍ह्याचाही वाटा

मिरजेच्या कला, साहित्य, संस्कृती व नाट्यक्षेत्राशी लोकमान्य टिळकांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते. त्याच्या काही घटना घडामोडींना इतिहास अभ्यासक व मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंग कुमठेकर यांनी दिलेला उजाळा. लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...

पटवर्धनांच्या अधिपत्याखाली असलेल्या मिरज संस्थानातील जनता रसिक, कलाग्रही आणि देशप्रेमी  होती. ब्रिटिशांनी लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला भरला तेव्हा तो चालवण्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्यात आली. या वर्गणी संकलनात इतिहास अभ्यासक वासुदेवशास्त्री खरे अग्रेसर होते. सामान्य लोकांनी सढळ हस्ते देणग्या दिल्या. आश्‍चर्य म्हणजे इथल्या नायकिणींनीही मोठ्या प्रमाणात वर्गणी देऊ केली होती. त्यांच्या दानशूरतेचे स्मरण टिळकांनी ठेवले. त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आजही ही पत्रे आहेत.

वासुदेवशास्त्रींशी टिळकांचा विशेष स्नेह होता. १९०६ मध्ये तत्कालीन सरकारी थिएटरमध्ये (आजचे बालगंधर्व नाट्यगृह) गुप्तमंजुष नाटक झाले; त्यासाठी लोकमान्य, बालगंधर्व आणि राजर्षी शाहू महाराज हे तिघे दिग्गज  एकत्र आले होते.  
१५ फेब्रुवारी १९२० ला सांगलीत ज्योतिष संमेलन झाले; त्यासाठीही लोकमान्य आले  होते. त्यावेळी मिरजकरांनी सरकारी थिएटरमध्ये वासुदेवशास्त्री खरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा भव्य सत्कार केला होता. टिळक त्यावेळी नुकतेच विलायतेहून आले होते; त्यामुळे खरे आणि टिळक यांच्या भेटीचे वर्णन ‘भरतभेट’ असं करण्यात आलं होतं. त्यावेळी अंबाबाई तालमीलाही त्यांनी भेट दिली होती. 

गीतेतील कर्मयोगाचे रहस्य सांगणारा एक लेख मिरजेतील विश्‍वनाथ कबाडेशास्त्री यांनी लिहिला होता. लोकमान्यांच्या ‘गीतारहस्य’ ग्रंथापूर्वीच तो पूर्ण झाला होता. ‘गीतार्थकथा अथवा विवेकवाणी’ असे त्याचे नाव आहे. टिळकांनी त्याची दखल घेत शास्त्रींनी आपले  विचार अगोदरच मांडल्याचे सांगितले. 

सांगली-मिरजेचा परिसर क्रांतिकारकांचा, साहित्यिकांचा आणि कलावंतांचा असल्याने लोकमान्यांचे येथे वारंवार येणे व्हायचे. येथील अनेकांशी त्यांचे जवळचे  ऋणानुबंध होते. कोल्हापुरातील ताई महाराज खटल्याच्या काळात काही दिवस ते मिरजेत होते. लोकमान्यांच्या वृत्तपत्राचे ‘केसरी’ हे नाव वासुदेवशास्त्रींनीच सुचवले होते. लोकमान्यांच्या अखेरच्या दिवसांत राजर्षी शाहू महाराजांनी मिरजेतील आपल्या बंगल्यात येऊन राहण्यास सुचवले होते. डॉ. विल्यम वॉन्लस यांच्याकडून योग्य वैद्यकीय उपचार मिळतील अशी राजर्षींना आशा होती. आजही हा बंगला मिरजेत वंटमुरे कॉर्नरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com