खंडणीबहाद्दरांचा पक्ष जाहीर करीन - खासदार राजू शेट्टी

खंडणीबहाद्दरांचा पक्ष जाहीर करीन - खासदार राजू शेट्टी

सांगली - ‘इस्लामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडणारे कोण आहेत, आम्हाला माहीत आहे. बलात्कार, खंडणी आणि खुनाचे गुन्हे दाखल झालेले गुन्हेगार हल्ले करत असतील; तर ते कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत आहेत, ते मी जाहीर करून टाकीन,’ असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. 

माढा मतदारसंघात शनिवारी (ता. २४)  राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून रयत क्रांती संघटनेने स्वाभिमानी संघटनेच्या कार्यालयावर केलेला हल्ला या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्‍नांवर ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व्यक्तिद्वेषातून आंदोलन  करत नाही. आमचे आंदोलन सरकारविरोधात नसून, धोरणाच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांच्या रोषाला एकाच मंत्र्याला सामोरे जावे लागले असे नाही, येथून पुढे मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याला शेतकऱ्यांचा आक्रोश व राग सहन करावा लागेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. 

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना गंडवले जाते, फसवले जाते. सन्मान योजनेचा लाभ अनेकांना मिळत नाही. ऑनलाइन अर्ज करावे लागत आहेत. त्यामुळे राग व्यक्त केला जात आहे. तूरखरेदीबाबत सांगितले जाते एक आणि प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या मनात उद्रेक तयार झाला, तर आश्‍चर्य वाटायला नको. व्यक्तिद्वेषातून आंदोलन करायचे काहीच कारण नाही. आज आम्ही ज्यांच्याविरोधात आंदोलन करतोय, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तींविरोधात आंदोलन केले आहे. तेही व्यक्तिद्वेषातून नव्हते आणि हेदेखील नाही. आंदोलन आंदोलनच असते. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरुद्ध बोललो असतो, तर माझ्या गाडीवर दगड पडले असते.’’

मला अडवणे आधीही कुणाला जमले नाही 
सदाभाऊ खोतांचा मुलगा सागर याने राजू शेट्टींची ताकारीतील सभा उधळण्याचा आणि त्यांना इस्लामपुरात फिरकू न देण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘मी नेहमी संचार करतो. नारदासारखा संपूर्ण महाराष्ट्रात माझा संचार असतो. यापूर्वी मला कोणी अडवले नाही. पुढेही कोणी अडवण्याची शक्‍यता नाही.’’

दूधभेसळीबाबत श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘दूधभेसळखोरांनी थैमान घातले आहे. त्यांच्यासाठी कायदे अपुरे पडत आहेत. भेसळयुक्त दुधाचा फटका ग्राहकांनाच नव्हे, तर उत्पादकांनादेखील बसत आहे. भेसळ ही वाईट असून आरोग्यास हानिकारकच आहे. दूधभेसळीमुळे इमानदारीने व्यवसाय करणारा मागे पडत आहे. भेसळखोरांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज आहे. भेसळीचा कायदा केंद्राशी संबंधित आहे. त्यांच्याकडून कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा केला जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com