मंत्रिपदाची मिजास नाही, सेवाच केली...- सदाभाऊ खोत

मंत्रिपदाची मिजास नाही, सेवाच केली...- सदाभाऊ खोत

इस्लामपूर - गेल्या सव्वा वर्षात मी सामान्यातील सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेऊन त्याची थेट अंमलबजावणी केली आहे. कृषी, पणन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या चार खात्यांचा राज्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी करताना गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले. मंत्रिपद हे मिजास मिरविण्यासाठी नसून लोकसेवेसाठी आहे, हे दाखवून दिलेय, अशी भूमिका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली. 

सरत्या वर्षातील कामगिरीचा त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘शरद जोशींच्या विचारांनी मी शेतकरी लढा केला. बदल घडविण्यासाठी राजकारणात आलो. २०१४ मध्ये माढा मतदारसंघून लोकसभेला लढलो. राज्यात राजकीय अस्तित्व तयार झाले. भाजप सरकारने माझी धडपड पाहून शेतकऱ्याच्या मुलाला मंत्रिमंडळात स्थान दिले. मंत्री होऊन आता सव्वा वर्ष झाले. या काळात धडक निर्णय घेतले. अडत बंद व्हावी म्हणून कित्येक दिवस शेतकरी चळवळीचे नेते आवाज उठवत होते. मी मंत्री होताच पहिल्या महिन्यातच अडत बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी बाजारपेठ खुली केली. शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण झाला. मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा माल विकला. सावता माळी आठवडा बाजार संकल्पनेला मंजुरी घेतली. शेतकरी-ग्राहक थेट संपर्क आला. सामान्य नागरिकांना फायदा झाला. दलाली बंद झाली. पणन खात्यात मोठा निर्णय घेताना बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला. बाजार समिती शेतकऱ्याच्या मालकीची झाली.’’ 

‘मी सेवक आहे’
सदाभाऊ म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ रयत क्रांतीने तळागाळात नेला. तालुक्‍यात साडेसात हजार कुटुंबांना लाभ मिळाला. तीन हजार महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून राज्यातील तीनशेवर लोकांना सात कोटींची मदत केली. मंत्री निवासातील एक खोली रुग्णांसाठी ठेवली असून, त्यांना एक सहायक दिला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘राज्यातील लाखो वंचित शेतकऱ्यांना तातडीने ठिबक अनुदान मंजूर करून दिले. कर्जमाफीवेळी माझ्यावर आरोप झाले; पण आजघडीला शेतकरी समाधानी आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून पाणीपुरवठा व ग्रामस्वच्छता खात्यांची जादा जबाबदारी सोपवली. वाळवा तालुक्‍यात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून १५ गावांना एक कोटी ते १२ कोटी निधी दिला. तेथे स्वच्छ, मुबलक पाणीपुरवठा होईल. संपूर्ण राज्यात माझे काम सुरू आहे. ऊस दरासंदर्भात शासनदरबारी पाठपुरावा करून एफआरपीमध्ये १ रिकव्हरीला २६८ रुपयांची वाढ करून घेतली. म्हणजे ९.५ रिकव्हरीला २५५०, बारा टक्के रिकव्हरीला ३२२० रुपये एफआरपी बसली. इचलकरंजी येथील रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात एफआरपी अधिक ३०० अशी पहिली उचल मागितली. तसाच तोडगा निघाला. चालू वर्षी उसाचा पहिला हप्ता ३००० ते ३१०० रुपये मिळतोय.’’

ते म्हणाले, ‘‘वाळवा तालुक्‍यातील विरोधक किती निधी आणला, अशी चर्चा करतात. तालुक्‍यात १८० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. तीन ते चार महिन्यांत लोकांना विकास दिसेल. इस्लामपूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण सुरू आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावे वाघवाडी फाट्याजवळील शासकीय कृषी महाविद्यालय होतेय. येडेनिपाणी येथील पांडू मास्तरांच्या स्मारकासाठी सव्वादोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com