जयंत पाटील मैदानात येऊन लढा: संभाजी पवार

jayant patil
jayant patil

सांगली: सर्वोदय साखर कारखान्याची लढाई सोळा हजार भूमिपूत्रांच्या हक्कांची लढाई आहे, त्यासाठी पृथ्वीराज पवार दहावेळा जेलमध्ये जायला तयार आहे. विश्‍वासघातकी राजकारण करणाऱ्या जयंत पाटलांनी आता पाठीवर वार करण्यापेक्षा मैदानात येऊन आमचा मुकाबला करून दाखवावे. संबंध जिल्ह्याचे राजकारण कलुषित करणाऱ्या जयंतनितीला सांगलीतूनच नव्हे तर वाळव्यातूनही हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे आव्हान माजी आमदार संभाजी पवार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिले. सर्वोदयचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार उपस्थित होते.

पृथ्वीराज यांच्याविरुद्ध राजारामबापू कारखान्याने मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यात त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, "कारखाना सर्वसामान्य, कष्टकऱ्यांच्या हिंमतीने उभा राहिलाय. भाड्याने रहायला घर दिले आणि ते माझ्याच मालकीचे झाले, असा घुसखोरीचा प्रकार झाला आहे. त्याविरुद्धचा कायदेशीर लढा सुरुच आहे. पृथ्वीराज या लढाईत कोणत्याच दबावाला बळी पडणारा नाही आणि तो राजकारणातील परिणामांची तमाही बाळगत नाही. उलट, सर्वोदयच्या लढाईत कारावासाची शिक्षा स्वाभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. आता विषय राजकारणातील घातकी जयंतनितीला मूळातून उखडून टाकण्याचा आहे. त्या नितीला हद्दपार करण्यासाठी साऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सांगलीपासून ते जतपर्यंत ज्याच्या खांद्यावर हात टाकला त्याचा घात केला. राजारामबापूंना ताकद देणाऱ्या माणसांना मातीत घालण्याचे पाप केले. बापूंना सांगलीत सभा घेता येत नव्हत्या, दगडफेक व्हायची तेंव्हा मी पाय रोवून उभा राहिलो. सांगलीत महाआघाडीची बांधणी केली तेंव्हा जयंतरावांना मी पालखीत घालून आणले, ज्या विजयसिंह पटवर्धन यांच्या घरी महाआघाडीची बांधणी झाली, त्या राजेंवर ह्यांनी गुन्हा दाखल करायला लावला. माझ्याविरुद्ध झोपडपट्टी हटाव प्रकरणी आयुक्तांकरवी गुन्हा दाखल केला. सांगली विधानसभेला ह्यांच्याच पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील यांना तीन हजार मते मिळाली, ही सारी जयंत पाटलांची कूटनितीच होती.''

ते म्हणाले, ""या प्रवृत्तीला मीच हद्दपार केले. गेल्या निवडणुकीत माणसं शोधायची वेळ आली. आता उणेपुरे 23 लोक आहेत. त्यात सात गट झाले आहेत. तेही ह्यांचेच कर्तृत्व. मी इतकी वर्षे साथ देऊन माझा घात होऊ शकतो तर ह्यांचे काय? लोकांनी या घातकी, धूर्त माणसाला ओळखले आहे. आता महापालिकेत डाळ शिजणार नाही म्हटल्यावर कॉंग्रेससोबत सलगी करून कोसळलेला तंबू पुन्हा उभा करण्याचा डाव सुरु आहे. तो यशस्वी होणार नाही. जयंतरावांना आमचे उघड आव्हान आहे, त्यांना मैदानात यावे. सर्वोदय कारखान्याच्या निवडणूकीत त्यांनी पळ काढला, विधानसभेला पाठीमागून डाव खेळला. आमच्यावरही त्यांनी टोकाचे आरोप केले असते, आम्हीही मानहानीचा दावा दाखल करू शकलो असतो, मात्र आम्हाला रडीचा डाव खेळायचा नाही. थेट लढाईत आम्ही जिंकतोय आणि त्याची जयंतरावांना भिती वाटतेय.''

"सर्वोदय' लवकर ताब्यात
पृथ्वीराज पवार म्हणाले, ""सर्वोदय साखर कारखाना लवकर सभासदांच्या ताब्यात आलेला दिसेल. कायदेशीर लढाईत आपली बाजू भक्कम व सत्याची आहे. त्यातील पहिली व महत्वाची लढाई जिंकली आहे. केवळ किती पैसे द्यायचे आणि कारखाना ताब्यात घ्यायचा, एवढाच निकाल बाकी आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com