हिंदूराष्ट्रासाठी संविधान संपवण्याचा डाव - सीताराम येच्युरी

हिंदूराष्ट्रासाठी संविधान संपवण्याचा डाव - सीताराम येच्युरी

सांगली - भारतीय धर्मनिरपेक्ष लोकशाहीला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने मोदींचे सरकार झपाटून काम करतेय. त्यासाठी सर्वप्रथम संविधान उखडून टाकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. हा धोका परतावून लावायचा असेल, तर धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे लागेल. त्यांच्यासह दलित, शोषित, महिलांची एकता देशासमोरचा हा धोका टाळू शकेल, असे मत कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी)चे केंद्रीय सरचिटणीस, माजी खासदार सीताराम येच्युरी यांनी आज येथे स्पष्ट केली. 

येथील मराठा समाज भवनमध्ये माकपच्या 22 व्या राज्य अधिवेशनाचे उद्‌घाटन येच्युरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार रसय्या अडम अध्यक्षस्थानी होते. स्वागताध्यक्ष ऍड. व्ही. वाय. पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, माकपच्या केंद्रीय समिती सदस्य सुधा सुंदरामन, महेंद्र सिंग, डॉ. अशोक ढवळे, विठ्ठलराव मोरे, अॅड. सुभाष पाटील, कॉ. उमेश देशमुख, डॉ. नामदेव गावडे उपस्थित होते. 

येच्युरी यांनी मोदी सरकारच्या देश-विदेशी धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ""देशासमोर अशा प्रकारचे संकट पहिल्यांदाच उभे आहे. सामान्यांसाठी दररोजचे जगणे कठीण बनवणारी आर्थिक स्थिती आहे. धनिकांचा विकास होतोय आणि गरीब अधिक गरीब होतोय. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद सोडले, तेंव्हा विकास दरात एक टक्का जनतेकडे 49 टक्के संपत्ती होती. मोदींच्या काळात गेल्या तीन वर्षात या एक टक्का लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. दुसरीकडे जातीय मतभेद वाढवून सांप्रदायिक धुव्रीकरण केले जात आहे. हिंसा वाढत आहेत. संविधान बदलाची भाषा ही देशातील लोकशाही संपवणारीच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमुर्तींना पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे, असे सांगावे लागले, हे घातक आहे. अभ्यासक्रमात त्यांना हवे तसे बदल होत आहेत. गोरक्षाच्या नावावर झुंडशाही वाढतेय. स्वतंत्र आणि निष्पक्ष भारत ही प्रतिमा पुसट होऊन अमेरिकन साम्राज्यवादाच्या हातातील एक बाहुले बनतोय.'' 

ते म्हणाले, ""या सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 80 हजार कोटी नव्हते, मात्र त्याचवेळी तब्बल 2 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी उद्योगांना देण्यात आली. खरे तर दिवाळखोरीतील बॅंका वाचवण्यासाठी सरकारने कर्ज घेतले आणि आता सरकार दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली आहे. जागतिक धोरणे ही देशाला पुढे नेणारी नसून जगाच्या खुंट्याला बांधणारी आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात विदेशी गुंतवणूकीच्या नावाने ओरडणारे भाजपवाले आता रेल्वे, संरक्षणासह सर्व सेवांमध्ये विदेशी गुंतवणूक आणत आहेत. लोकांना सेवा पुरवणाऱ्या बहुतांश क्षेत्रांच्या खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. लोकांच्या मालकीची क्षेत्रे धोक्‍यात आणली जात आहेत. भूमी सुधार नावाची योजना शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योजकांच्या हिताची आहे. हे सारं देशाला संकटात नेणारं आहे. त्यापुढे जाऊन आता हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी जे काही करता येईल ते ते सुरु करण्यात आले आहे. त्यातून वाचायचं असेल तर आपणाला एकजूट झालं पाहिजे. पक्ष म्हणून माकपची भूमिका अधिक बळकट केली पाहिजे.'' 

मोदींवर हल्लाबोल 

सीताराम येच्युरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, ""पंतप्रधानांचा नारा "जय हिंद' नसून "जिओ हिंद' असा झाला आहे. रॅफेल विमानांचे काय झाले, या प्रश्‍नावर ते बोलत नाहीत. पूर्वीच्या सरकारमध्ये खरेदीसाठी मध्यस्थ होते, आता ह्यांनी थेट स्वतःच ती भूमिका पार पाडली आहे. सुरक्षेच्या कारण दिलेय, मात्र खरे सांगायला तोंड नाही, ही वस्तूस्थिती आहे. पनामा पेपर्स प्रकरणात गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींचेही नाव आहे, मात्र त्याची चौकशी झाली नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com