सांगली जिल्ह्यातील उसाच्या झटपट तोडग्यामागे "गोड गुपित' 

सांगली जिल्ह्यातील उसाच्या झटपट तोडग्यामागे "गोड गुपित' 

सांगली -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप सरकारला शिंगावर घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ऊस दराचा प्रश्‍न जास्त चिघळेल, अशी शक्‍यता निर्माण झाली होती. वास्तविक, तसे झाले नाही. ऊस दराचा तोडगा अपेक्षेहून अधिक झटपट झाला. त्यामागे उसाच्या फडातील राजकीय रंगही समोर येऊ लागले आहेत.

जिल्ह्यापुरती चर्चा करताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील जिल्हा बॅंकेचा या प्रश्‍नी पुढाकार आणि खासदार राजू शेट्टी या एकमेव शेतकरी नेत्याशी चर्चा करून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांसह अन्य शेतकरी नेत्यांना "नॉट टू बी नोटिसेबल' करण्याचा डाव खेळला गेला. 

जिल्हा बॅंकेत सायंकाळी 6.30 ची वेळ होती... अध्यक्ष दिलीप पाटील जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना मोबाईल करत होते... "मग, करू का डिक्‍लेर', असे विचारत होते... "होय करून टाका', असा प्रतिसाद येत होता. उसाच्या पहिल्या उचलीवर एवढ्या सहजसोप्या पद्धतीने कधीच तोडगा निघाला नव्हता. तो काल निघाला. खासदार राजू शेट्टी कोल्हापुरात होते. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एफआरपी अधिक 200 रुपयांचा तोडगा निघाला होता. तो इथेही तसाच जाहीर करावा, यासाठी दिलीप पाटील यांनी शेट्टींना पाचारण केले.

दिलीपतात्या मातब्बर राजकारणी आहेत, मात्र एवढा मोठा निर्णय त्यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या परस्पर घेतला नसेल, असे गृहीत धरायला हवे. कारण, जिल्ह्याच्या ऊस दर प्रश्‍नी जयंतराव नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत. जिल्ह्यातील एकूण ऊस गाळपाच्या सुमारे 30 ते 34 टक्के ऊस एकट्या राजारामबापू साखर कारखान्याच्या 4 युनिटमध्ये गाळला जातो. त्यामुळे जयंतरावांचा प्रभाव सहाजिक आहे. शेट्टींशी असलेले हाडवैरी अलीकडे "ठिसूळ' झालेले आहे. त्यांनी सदाभाऊ खोतांवर निशाणा रोखला असून हळूच शेट्टींच्या खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्नही लपून राहिलेला नाही. राजकीय रंग काटा बदलताना साऱ्यांना दिसताहेत. त्याचा एक नमुना म्हणून कालच्या ऊस दर तोडग्याचा बैठकीकडे पाहता येईल. दिलीपतात्यांनी सदाभाऊंना थाकासतूर लागू न देता बैठक लावली अन्‌ यशस्वी करून टाकली. सदाभाऊंचे कार्यकर्ते तिकडे "कोल्हापूरची साखर' वाटत असताना इकडे दिलीपतात्या राजू शेट्टींना टॉवेल-टोपीचा आहेर करत होते. 

ऊस दराच्या फडात राजकीय हलगी वाजतेच, मात्र त्यापलीकडे जाऊन साखर दर आणि एफआरपीच्या गणित या अंगानेही विचार होतो. त्याचा कानोसा घेताना साखर कारखानदारांनी सहन होण्यासारखे आहे म्हणूनच हा तोडगा मान्य केल्याची कबुली "सकाळ'शी बोलताना दिली आहे. सध्या साखरेचे दर 3450 ते 3650 रुपयांच्या घरात खेळताहेत. ते कमी व्हायची शक्‍यता तूर्त नाही. त्यामुळे 12.50 उताऱ्याला पहिली उचल 3000 रुपये देणे शक्‍य असल्याची कारखानदारांनी भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनीने चालवायला घेतल्याने नाही म्हटले तरी जिल्ह्यात टोकाची स्पर्धा आहे. अशावेळी आंदोलनात ताकद वाया घालवून परवडणारे नाही, याची पुरती जाणीव कारखानदारांना होती.

या साऱ्या स्थितीत भाजप वगळता इतर सर्वांसोबत सबुरीनं घेण्याची राजू शेट्टींचा राजकीय प्रयत्न निश्‍चितच राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यापुरता विचार करताना त्यांनी जिल्हा बॅंकेचं आमंत्रण स्वीकारलं अन्‌ तोडगाही जाहीर करून टाकला. सहाजिकच, अन्य संघटनांकडून त्याला विरोध होणार आहे, तो चालूच राहिली. त्यात ताकद किती असेल, हाच कळीचा मुद्दा आहे. 

उतारा आणि एफआरपी अधिक 200 प्रमाणे होणारे बिल 

* साखर कारखाना * उतारा * सरासरी दर 
* हुतात्मा * 13.28 * 3213 
* राजारामबापू जत * 10.82 * 2553 
* महांकाली * 10.83 * 2556 
* माणगंगा * 10.26 * 24.03 
* राजारामबापू साखराळे * 12.90 * 3111 
* राजारामबापू वाटेगाव * 12.85 * 3097 
* सोनहिरा * 12.68 * 3052 
* विश्‍वास * 11.75 * 2803 
* वसंतदादा * 10.74 * स्पर्धात्मक 
* क्रांती * 12.50 * 3004 
* मोहनराव शिंदे * 12.02 * 2875 
* सर्वोदय * 13.0 * 3138 
* केन ऍग्रो * 11.60 * 2762 
* निनाईदेवी * 12.35 * 2963 
* श्री श्री * 11.01 * 2602 
* उदगिरी शुगर्स * 11.78 * 2811 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com