ताकारी, म्हैसाळ योजनेला निधीचा ओघ

म्हैसाळ योजनेचा कालवा
म्हैसाळ योजनेचा कालवा

१३ कोटींची निविदा - जत, कवठेमहांकाळमधील सात कामांचा समावेश

सांगली - कृष्णा खोरे विकास महामंडळाने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या सुमारे १३ कोटींहून अधिक रकमेच्या कामांची निविदा जारी केली आहे.

कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील ही कामे आहेत. सुधारित प्रस्तावानुसार ही कामे होतील. मूळ प्रस्तावित योजनेचा १९०० कोटी रुपयांचा निधी खर्ची पडल्यानंतर गेल्या अडीच-तीन वर्षांपासून योजनेचे काम थांबले होते. आता पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेशानंतर पुन्हा निधीचा ओघ सुरू झाला आहे. 

राज्यातील सर्वांत अडचणीत आलेल्या योजनांमध्ये म्हैसाळ योजनेचा समावेश होतो. त्यामुळे या योजनेचे नेमके भवितव्य काय राहील, याविषयी शंका घेतल्या जात होत्या. सध्या कार्यरत असलेल्या कालव्यांतून पाणीपुरवठा आणि उर्वरित बांधकाम या दोन्ही पातळीवर आबादी-आबाद होते. मात्र या योजनेच्या सुधारित  ४९५९ कोटी रुपयांचा प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने सर्वांत मोठा प्रश्‍न मार्गी लागला होता. अर्थात, सध्या ‘नारळ फोडा’चा धडाका आहे. त्यामुळे या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष होते. आता प्रत्यक्ष निविदा जाहीर झाल्याने कामाला सुरवात होणार, हे स्पष्ट झाले आहे. ही योजना आता केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट झाली आहे. त्याचा फायदा कवठेमहांकाळच्या उर्वरित भागासह जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्‍यांना होणार आहे. जत तालुक्‍यातील कामांना आता गतीने सुरवात होणार आहे. 

पहिली निविदा प्रसिद्ध झाली असून ती सुमारे १३  कोटींहून अधिक रकमेची आहे. अंकले (ता. जत) येथील पंपगृह, वीज नियंत्रण इमारती (२.३८ कोटी), खलाटी पंपगृह (१.९६ कोटी), खलाटी गोदाम व मिटरिंग रूम (१.१६ कोटी), आगळगाव जाखापूर (ता. कवठेमहांकाळ) योजना पंपगृह इमारत व इतर कामे (२.२२ कोटी), याच योजनेचे नियंत्रण कक्ष, कार्यालय (१.१९ कोटी) आदी कामांची निविदा जारी करण्यात आली आहे. यासह जत शाखा कालव्याचे अस्तरीकरण, मातीकाम, बांधकामे (२.१९ कोटी); देवनाळ कालव्याचे मातीकाम, बांधकामे, अस्तरीकरण (२.०८ कोटी) कामे आहेत.

केंद्राकडून दक्षता
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट झालेल्या योजनांबाबत केंद्र शासन अतिशय दक्ष आहे. गेल्या महिन्यात म्हैसाळ, ताकारी योजनेच्या गेल्या काळातील कामांचा लेखाजोखा कॅगच्या अधिकाऱ्यांनी केला होता. त्याचा सविस्तर अहवाल आणि सुधारणापत्र यथावकाश मिळेल, मात्र केंद्राने नव्याने निधी मंजूर करताना सूचक इशाराही दिला आहे. त्यामुळे या कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष असेल.

दोन वर्षांचे उद्दिष्ट
केंद्र शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट झाल्यानंतर ताकारी-म्हैसाळ योजनेच्या उर्वरित कामांना दोन वर्षांचा अवधी देण्यात आला आहे. सन २०१९ पर्यंत कामे मार्गी लावावीत, अशा स्पष्ट सूचना आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com