मिरजेत वाहतुकीचा बट्ट्याबोळ, हप्तेखोरीचा विळखा

मिरजेत वाहतुकीचा बट्ट्याबोळ, हप्तेखोरीचा विळखा

मिरज - मिरजेत कोणत्याही रस्त्याने प्रवेश करा तुम्हाला तेथे एकवेळ दिशादर्शक फलक दिसणार नाही; पण पावती पुस्तक घेऊन उभारलेला पांढऱ्या खाकी वेशातील पोलिस नक्की दिसेल. शहरातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांवर डझनाने बळी जात असताना वाहतूक नियंत्रणासाठीची पोलिस यंत्रणा वरिष्ठांच्या आदेशावरून वसुलीत मश्‍गूल असतात. म्हैसाळ रस्त्यावरील वसुलीची तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकारीस्तरावर चर्चा झाली. मात्र दररोज सामान्य नागरिकांचे रस्त्यावरच बळी जात असताना पोलिसमात्र बघ्याची भूमिका घेतात.
परप्रांतांतील वाहने म्हणजे जणू शिकारच 
शहरातील रुग्णालये, दर्गा, तंतुवाद्याची पंरपरा यासह अनेक व्यवहारांसाठी कर्नाटकासह, आंध्र प्रदेशातून  दररोज हजारो नागरिक नियमितपणे मिरजेला येतात. पण शहरात आल्यानंतर एकतर कोठेही दिशादर्शक फलक दिसत नसल्याने एखाद्याने पोलिसांना पत्ता विचारलाच तर गाडी नंबर पाहून पोलिस लगेच पावती पुस्तक काढून  जणू काही शिकार चालत आल्याच्या आविर्भावात त्याची पावती करण्यासाठी गाडी रस्त्याकडेला घेण्यास भाग पाडतात आणि तिथेच पावती आणि ‘बिनपावती’च्या वसुलीचा सिलसिला सुरू होतो.

वाळू, मुरूम माफियांमुळे अनेकांचे बळी  
शहराच्या मध्यवस्तीतूनच रत्नागिरी-नागपूर महामार्ग जात असल्याने या रस्त्यावरून मोठ मोठ्या अतिरिक्त वजनाच्या गाड्या राजरोसपणे जात असतात. यामध्ये वाळू, मुरूम आणि अन्य अवजड मालाच्या गाड्यांचा 

मोठ्या संख्येने समावेश असतो. मिरजेतील शास्त्री चौक, कोल्हापूर नाका ते महात्मा गांधी चौकापर्यंत या अवजड वाहनांमुळे गेल्या पाच वर्षांत शेकडो बळी घेतले आहेत. पण एखादा मोठा अपघात झालाच तर संबंधित वाहनचालकाविरुद्ध जुजबी गुन्हा दाखल करण्यापलीकडे पोलिस यंत्रणा काही करत नाही. 

राजे, बापू, दादांच्या वेगवान गाड्या 
मिरजेच्या गल्ली बोळात सध्या महागड्या, मोठ्या आवाजाच्या दुचाकी वाहनांचा तर धुमाकूळ सुरू आहे. यापैकी बहुसंख्य दुचाकी वाहनांना नबंरप्लेटही नाहीत. अनेक दुचाकींच्या नंबर प्लेटवर ‘राजे’ ‘बापू’ ‘दादा’ ‘भाऊ’ ‘रुल ब्रेकर’ असा मजकूर सर्रासपणे दिसतो. सातवी आठवीतील मुले बेफाम वेगाने दुचाकीवरून मार्केटसारख्या गजबजलेल्या परिसरात थरार निर्माण करतात. पण वाहतूक पोलिस यंत्रणा मात्र त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करते. 

वाहतूक सुधारणांचे नामोनिशाण नाही. 
महात्मा गांधी चौक, शिवाजी स्टेडियम, बसस्थानक, वंटमुरे कॉर्नर, या ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासह, स्टेशन परिसरात पॅगो रिक्षांसाठी थांबा तयार करून तिथे शिस्त लावणे, रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा पाठपुरावा करणे, एकदिशा  मार्गांची पुनर्रचना करण्यासह अनेक वाहतूक सुधारणा करण्यासाठीही वाहतूक नियंत्रण शाखेने प्रयत्न करणे अपेक्षित असताना त्याबाबत केवळ 
कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीच या यंत्रणेकडून घडत नाही. नागरिक रस्त्यावर उतरून जाब विचारतील.

आधीच गणंग कारभाऱ्यांमुळे मिरज बदनाम झाली आहे. त्यात आता नाक्‍यानाक्‍यावर थांबलेल्या वर्दीतील वसुली बहाद्दरांमुळे जर मिरज आणखी बदनाम होणार असेल, तर नागरिकांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नसेल. पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांसमोर वारंवार चर्चा होऊनही वसुलीचा हा दुष्टाचार थांबत नसेल आणि  बदनामी सुरूच राहणार असेल तर त्याविरुद्ध आम्हा नागरिकांना रस्त्यावर येऊनच याचा जाब विचारावा  लागेल. 
-विलास देसाई, जिल्हा अध्यक्ष, मराठा सेवा संघ

गेल्या अनेक वर्षांत मिरजेला एखादाही वरिष्ठ पोलिस अधिकारी चांगला कर्तबगार म्हणवून घेणारा लाभला  नाही. ज्यांच्यावर विश्‍वास ठेवायचा तेच खाऊपासरी निघतात. अनेक चांगली कामे करणे शक्‍य असूनही  केवळ बाजारू प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे मिरज झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर बाजारकरूसारखे वागू नये.

- तानाजी रुईकर, जिल्हा सुधार समिती कार्यकर्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com