सांगली : जिल्ह्यात काही खासगी बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जासाठी जामीन झालेल्या व्यक्तींच्या कागदपत्रांचा गोलमाल करून बोगस कर्ज प्रकरणांद्वारे जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा धडाका लावला आहे. बँक किंवा कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, मूळ वाहन मालक यांचे हे संयुक्त षड्यंत्र असून त्यात शेकडो सामान्य लोक भरडून निघत आहे. या प्रकरणात घर, जमीन विकून पैसे भागवण्याची वेळ लोकांवर आली आहे.
बनावट कर्ज प्रकरणांचा काही कोटी रुपयांचा घोटाळा सध्या जिल्ह्यात झाला आहे. त्यातील बहुतांश प्रकरणे वादात अडकलेली आहेत. सदर बँका आणि फायनान्स कंपन्या बहुतांश वाहन खरेदीला कर्जपुरवठा करतात. त्यासाठी वाहन मालक कर्जदार आणि दोन जामिनदारांची कागदपत्रे घेतली जातात. त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. जामिनदारांची कागदपत्रे वापरून त्यांच्या नावाने वेगळे प्रकरण मंजुरीला घेतले जाते. त्यांच्या नावे जुने वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज उचलले जाते.
सदर वाहन कुणाकडे असते, त्याचा पत्ता लागत नाही. कागदोपत्री जामिनदार त्याचा मालक होतो. कर्जाचे पैसे बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी हडप करतात. काहीकाळाने वसुली थकली म्हणून वाहन जप्तीचे नाटक केले जाते. वाहन विकण्याचा बहाणा करून नाट्य उभे केले जाते. वाहन जप्त केले जाते, ते लिलावात काढण्यासाठी कागदपत्रे तयार केली जातात. ते विकले जाते. त्यातून कमी रक्कम हाती लागल्याचे सांगून उर्वरित कर्ज रक्कम वसुलीसाठी दावा केला जातो. या संपूर्ण व्यवहाराची मूळ व्यक्तीला माहितीच नसते. न्यायालयाची नोटीस लागल्यानंतर ती व्यक्ती जागी होते आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
अशा प्रकरणांत वकील नेमा, न्यायालयात फी भरा, वेळ काढा, एवढे करण्यापेक्षा २५ हजार द्या, ५० हजार द्या आणि प्रकरण सेटल करून टाका, सा प्रस्ताव बँक किंवा फायनान्स कंपनी देते. जे कर्ज घेतलेच नाही, ते मिटवायचे कशासाठी? तोवर वेळ झालेला असतो आणि बदनामीची भीती दाखवून कोंडी केली जाते. अशी काही प्रकरणे सध्या वादात अडकलेली आहेत. अशा प्रकरणांत फसलेल्या लोकांनी एकजूट करून या कंपन्या आणि कारवाईविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.
दक्षिण भारतातील न्यायालयात दावा
यातील अनेक कंपन्या या दक्षिण भारतातील आहेत. त्यांचे वसुलीसाठीचे दावे दक्षिण भारतातील न्यायालयात दाखल करून येथील लोकांची मुद्दाम डी केली जाते. बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद येथील न्यायालयाच्या नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर कसे द्यायेच? तेथे तारखांना हजेरी कशी लावायची? किती से खर्च करायचे? त्यापेक्षा पैसे भरून रिकामे व्हा, अशी कोंडी करण्याचा डाव खेळला जातो.
''बोगस कागदपत्रे बनवून, खोट्या सह्या करून वाहन खरेदी-विक्री झाल्याची काही प्रकरणे माझ्याकडे आहेत. बँका किंवा खासगी फायनान्स कंपन्यांतील कर्मचारी हा बोगस प्रकार करतात आणि वरकमाई करून काम सोडून पळून जातात. त्यानंतर कंपन्या हात वर करून रिकाम्या होतात. हे गंभीर प्रकार फसवणूक झालेल्यांनी न्यायालयात धाव घेऊन अशा कंपन्यांना उघडे पाडलेच पाहिजे.''
- ॲड. प्रशांत पाटोळे, सांगली
''सांगलीतील एका बँकेतून कर्ज घेऊन माझ्या मित्राने वाहन खरेदी केले. मी त्याला जामीन होतो. माझी ती कागदपत्रे वापरून माझ्या नावाने आणखी एक वाहन बनावट पद्धतीने खरेदी केले. बँक कर्मचाऱ्याने हा घोटाळा केला. आता ते वाहन कुठे आहे माहिती नाही, परंतु त्याच्या वसुलीसाठी माझ्यावर दावा ठोकला असून, मानसिक त्रास दिला जात आहे. गरिबांची घरे जाळण्याचा हा प्रकार आहे.''
- विनायक ढोले, बेडग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.