"सकाळ'च्या पाठपूराव्यास यश; पुस्तकांच्या गावास मिळाले बळ

"सकाळ'च्या पाठपूराव्यास यश; पुस्तकांच्या गावास मिळाले बळ

भिलार (जि. सातारा) : विविध क्षेत्रात होणारा मराठीचा वापर गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्य मराठी विकास संस्थेला तब्बल दहा वर्षांनी पूर्णवेळ संचालक मिळाला आहे. संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे हा पदभार प्रतिनियुक्तीने सोपवण्यात आल्याने पुस्तकांच्या गावाला आणखी बळ प्राप्त होणार आहे. काही मंत्रालयीन कर्मचाऱ्याच्या उदासीनतेमुळे या उपक्रमावर आलेले अनिश्‍चितीचे सावट दूर होण्यास मदत होणार आहे. 

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालकपद 13 मार्च 2010 पासून रिक्त होते. या पदावर प्रभारी म्हणून नेमणुका होत होत्या. राज्य मराठी विकास संस्थेने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून भिलार (ता. महाबळेश्‍वर) हे पुस्तकांचे गाव बनवले. बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत या विभागातील काही मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी या पुस्तकांच्या गावाला खो घालण्याचे प्रयत्न सुरू केले. येथील कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही. काहींना घरी पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे भिलार ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून मंत्री एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला. "सकाळ'नेही वस्तुस्थिती मांडली. या सर्व पार्श्‍वभूमीवर हालचाली घडून अखेर श्री. पाटील यांच्याकडे दोन वर्षांसाठी विशेष बाब म्हणून हा पदभार सोपवण्यात आल्याचे मराठी भाषा विभागाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले. श्री. पाटील यांनी पदभार स्वीकारला असून राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेनुसार ही संस्था ज्या उद्दिष्टांसाठी निर्माण झाली, ती गाठण्याचे ध्येय नजरेसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
 
डॉ. प्रा. आनंद काटीकर यांच्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्याकडे हा पदभार होता. ही धुरा आता संजय पाटील सांभाळतील. वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्यानंतर संस्थेच्या संचालकपदी पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती झाली नव्हती. पुस्तकांचं गाव बंद होणार या वावड्या उठत असताना आता मात्र हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग होणार असल्याच्या बातम्यांबाबत श्री. पाटील म्हणाले, "ज्या गोष्टींचा निर्णय अथवा शक्‍यताच नाही, त्याबाबत चर्चा करणे अथवा बोलणेही उचित नाही. 

पुस्तकांचं गाव बंद होणार, पुस्तकांचं गाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करणार, अशा पसरणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मंत्रालयीन पातळीवरील निर्णय उपमुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का? आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या विषयाबाबत भेटलो असून, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या विषयावरील चर्चा थांबवावी. 
बाळासाहेब भिलारे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

वाचा : सरकार कुठले यापेक्षा आमची सामूहिक एकी महत्वाची : एकनाथ शिंदे

हेही वाचा : वाचनप्रेमींसाठी धक्कादायक बातमी; पुस्तकांचं गाव गुंडाळणार ?

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com