सातारा - मटका, खुनाचा प्रयत्न व शेती पंपांच्या मोटारींची चोरी करणाऱ्या विविध तालुक्यांतील टोळीतील 13 जणांना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपार केले आहे.
भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका घेणाऱ्या विनोद सावकार धोत्रे (वय 37), मारुती शिवाजी भिंगारे (वय 39), रमेश पांडुरंग गायकवाड (वय 55, सर्व रा. पाचवड, ता. वाई), अमोल सखाराम जाधव (वय 22), सूर्यकांत सदाशिव बांदल (वय 42), संतोष गुलाबराव निकम (वय 43, सर्व रा. अमृतवाडी, ता. वाई) व राहुल रामदास गाडगीळ (वय 30, रा. घुमटआळी, भुईंज, ता. वाई) या सात जणांना सहा महिन्यांसाठी सातारा, जावळी, वाई, खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर या सहा तालुक्यांतून तडीपार करण्यात आले आहे.
वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गर्दी-मारामारी व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील नीलेश ज्ञानदेव जाधव (वय 31), अभिजित गोरख जाधव (वय 27) व किरण विलास जाधव (वय 25, सर्व रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) यांना सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, फलटण, खंडाळा या तालुक्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
तिसरी टोळी फलटण तालुक्यात शेती पंपांच्या मोटारींची चोरी करणारी आहे. त्यातील अनिल कुमार मकवाणी (वय 28), पृथ्वीराज जयवंत जाधव (वय 27) व भरत रघुनाथ जुवेकर (वय 28, सर्व रा. जिंती नाका, फलटण) यांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्हा तसेच बारामती व पुरंदर तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तडीपारांची संख्या 146 वर पोचली आहे.
|