शेतकऱ्यांच्या माथ्यावर कळवळ्याचे ढग

शेतकऱ्यांच्या माथ्यावर कळवळ्याचे ढग

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न 
सातारा - शेतकऱ्यांनी आंदोलनाचे ऐतिहासिक हत्यार उपसल्यानंतर सत्तारूढांसह सर्वच विरोधी पक्षही चक्राहून गेले असून, प्रत्येक जण आता शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवू लागला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी कसे आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाडून सारेच पक्ष करीत आहेत. एरवी जून महिन्यात शेतकऱ्यांना ओढ असते, ती मॉन्सूनच्या ढगांची. यंदा मात्र, बेगडी कळवळ्याच्या ढगांनी त्यांचा आसमंत व्यापला आहे.

शेतकऱ्यांची सुरू असलेली परवड संपावी आणि त्याला कर्जाच्या जोखडातून मुक्त करावे, तसेच शेतीमालाला हमीभाव जाहीर व्हावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, या मागणीसाठी एक जूनपासून शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध माध्यमांतून शेतकरी संघटनांनी आंदोलने सुरू ठेवली आहेत. या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संप मध्येच संपविण्याचा प्रयत्न केला; पण शेतकऱ्यांना सदाभाऊंसह सर्वच ‘कटाप्पां’ना बाजूला ठेवत आपले आंदोलन सुरूच ठेवले. कधी नव्हे तो शेतकरी संपात सहभागी झाल्याने शेतकऱ्यांप्रती कळवळा

दाखविण्यासाठी विरोधकांसह सर्व सत्ताधारी पक्षांनीही आपापली भूमिका मांडत त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात अजेंडा राबविण्यास सुरवात केली आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक एकत्र होणार असल्याने या निवडणुकीत किमान शेतकऱ्यांची मते आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना मिळावीत, यासाठी सर्वच पक्षांचे कॅंपेनिंग विविध माध्यमातून सुरू आहे. विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीने सुरवातीला संघर्ष यात्रा काढून या सर्व प्रक्रियेला तोंड फोडले. त्यानंतर शेतकरी संघटनांनी संपाचे हत्यार उगारले.

त्यांच्यातीलच काही नेत्यांनी संप मोडित काढण्याचे काम केले; पण त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करीत आपला संप सुरूच ठेवला. शेतकऱ्यांप्रती कळवळा जागा होऊन आता प्रत्येक पक्ष आपापला अजेंडा राबवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कर्जमाफी आणि विविध पक्षांच्या दिंडी, यात्रा, कर्जमाफीचे अर्ज भरणे, मुख्यमंत्र्यांना सनद देणे आदींतून वेगळीच वातावरण निर्मिती झाली आहे. खऱ्या अर्थाने शेतकरी राजासाठी सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेतकरी राजा आम्ही तुझ्याचसाठी..!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - शेतकरी क्रांती दिंडीच्या माध्यमातून गावोगावी कार्यकर्ते पाठवून तेथील शेतकऱ्यांचे कर्जमाफीबाबत जागृतीवर भर 
भारतीय जनता पक्ष - शिवार संदेश यात्रेतून आम्ही शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आणल्या व त्यातून शेतकऱ्यांचे कसे भले झाले हे समजावून सांगण्याचा प्रयत्न 
शिवसेना - शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यास सुरवात 
राष्ट्रवादी - येत्या शनिवारी (ता. १०) मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची सनद भेट देणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com