ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक!

ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक!

सातारा - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहे. सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागत असल्याने उमेदवार सायबर कॅफेसह महा-ई सेवा केंद्रांचा आधार घेत असल्याचे दिसते. संकेतस्थळाच्या सर्व्हरवर ताण येत असल्याने एक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागत आहेत. उमेदवाराला नवीन बॅंक खातेही काढावे लागणार असल्याने बॅंकांमध्येही इच्छुकांची गर्दी आहे. 

सातारा जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उद्यापर्यंत (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे सध्या अर्ज ऑनलाइन दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

तहसील कार्यालयातील सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सायबर कॅफेतही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सर्व ठिकाणी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसते. निवडणूक आयोगाचे नवीन नियम हे सायबर कॅफे व बॅंकांना चांगलेच फायदेशीर ठरले आहेत. या निवडणुकीत किमान एक हजार इच्छुक ऑनलाइन अर्ज दाखल करतील, असा अंदाज आहे. निवडणूक जरी बिनविरोध करायची झाली अथवा अर्ज मागे घ्यायचा असला, तरीही ऑनलाइन अर्ज भरण्याचे सोपस्कार पूर्ण करावेच लागणार आहेत. त्यामुळे या सर्वांनाच सायबर कॅफेत जावे लागत आहे. सायबर कॅफेत उमेदवार, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. एक अर्ज दाखल करण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागत आहेत. त्यातून एक अर्ज भरण्यासाठी ३०० ते ४०० रुपये आकारले जात आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे. दिवस-रात्र काम करावे लागत असल्याने हे दर आकारल्याचे सांगितले जात आहे.

अनेक कागदपत्रांचा लागतोय ‘आधार’
अर्ज भरताना एक जरी माहिती अपूर्ण राहिली, तरी उमेदवाराला पुढे जाता येत नाही. त्यामुळे उमेदवाराला हा अर्ज भरताना सातबारा, आठ अ, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार याद्या, आरक्षण प्रकारचा तक्ता, घर, सांपत्तिक स्थिती, बॅंकांतील शिल्लक रक्कम, कर्जाची आकडेवारी यांसारख्या माहितीची कागदपत्रे जवळ घेऊनच बसावे लागत आहे. 

अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्यापर्यंत आहे. या निवडणुकीत शक्‍यतो शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जातात. त्यामुळे उद्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होतील. त्यातून सर्व्हरवर ताण येऊन अर्ज भरण्यास आणखी वेळ लागण्याची शक्‍यता आहे. 

निवडणुकीमुळे बॅंकांनाही ‘अच्छे दिन’
सायबर कॅफे मालकांना उत्पन्नाचे साधन मिळाले असतानाच बॅंकांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्या प्रत्येकाला सरकारी अथवा अन्य बॅंकेत पूर्णपणे नवीन खाते उघडावे लागत आहे. निवडणूक खर्च याच खात्यातून करावा लागणार आहे. हे खाते किमान ५०० रुपयांना उघडावे लागत असल्याने बॅंकांची उलाढाल काही काळ वाढणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com