सातारा - कृषी कर्जमाफीसाठी नेमके किती शेतकरी पात्र ठरले, याबाबतची यादी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी ओपन करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण यादीच ऑफलाइन असल्याने अधिकारी थकले आहेत. दुसरीकडे यादीत आपल्या नावाचा समावेश झाला आहे का, याची नेमकी माहिती उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांतूनही संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना काही अटी व शर्तीवर कृषी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गावागावांतून शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले आहेत; पण सुरवातीपासून गोंधळात अडकलेली ही कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप तशीच राहिली आहे.
दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे पैसे खात्यावर जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन दिवाळी झाली, तरी पूर्ण झालेले नाही. सध्या चावडी वाचन झालेल्या गावांतील किती शेतकऱ्यांचा कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी यादीत समावेश झाला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. यासंदर्भात शासनाकडून "आपले सरकार' या पोर्टलवरील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थींची यादी ओपन होत नाही. त्यामुळे नेमके किती शेतकरी या दोन प्रकारात पात्र ठरले याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून उपलब्ध होऊ शकलेली नाही. अनेक जण यासंदर्भात उपलब्ध लिंकवर जाऊन यादी पाहण्याचा प्रयत्न करत आहेत; पण यादीच अपलोड झाली नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून ही पात्र लाभार्थ्यांची यादी ऑनलाइन पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत आहेत; पण ती ओपन होत नाही. "पेज इजन्ट वर्किंग' असा संदेश या पेजवर येत आहे. त्यामुळे यादी डाऊनलोड होण्यास आणखी किती दिवस लागणार अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.
सोशल मीडियावर रंगला वाद
कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी किती शेतकरी पात्र ठरले याची यादी दिसत नसल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता असतानाच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मात्र, एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांत व्यस्त आहेत. भाजपचे लोकप्रतिनिधी आम्ही ऐतिहासिक कर्जमाफी कशी दिली हे सांगत आहेत, तर विरोधी पक्षातील नेते मंडळी भाजपची ही कर्जमाफी कशी फसवी आहे, यावरून टीकेची झोड उठवू लागले आहेत. हा वाद सोशल मीडियावर अधिक रंगला आहे.
|