नगर : "नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांच्या अदलाबदलीविषयी पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी याबाबत व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे. ते त्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडलेले नाही. त्यांनी ते थेट प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करणे पक्षशिस्तीत बसणारे नाही. यापूर्वी आमदार राहुल जगताप यांनीही असेच वक्तव्य केले होते. त्यामुळे अभंग व जगताप यांच्यावर काय कारवाई करायची, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आदी वरिष्ठ नेते घेतील,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काकडे म्हणाले, ""लोकसभेची कोणती जागा लढवायची व कोणास उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील. अभंग यांना काय वाटते, याला काडीचीही किंमत नाही. नगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच असेल. कार्यकर्त्यांचेही तेच मत आहे. अभंग यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. चार भिंतींच्या आत पक्षश्रेष्ठींसमोर त्यांनी बोलावे. त्यावर पक्षास योग्य वाटल्यास तसा निर्णय होईल. इतर पक्षांतील उमेदवार आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुचविणे योग्य नाही. आमच्या पक्षात ताकदीचे अनेक नेते आहेत. दादा कळमकर, नरेंद्र घुले, प्रताप ढाकणे, तसेच गडाखही आमच्या आघाडीबरोबर आहेत.''
"विधानसभा व महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचाच विजय होईल. केडगाव प्रकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही,'' असा दावा त्यांनी केला.
महापालिका निवडणुकीसाठी समिती
"नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, हे स्थानिक नेते चर्चा करून ठरवतील. त्यासाठी जिल्हा शहराध्यक्ष माणिक विधाते, आमदार संग्राम जगताप, दादा कळमकर यांची समिती तयार करण्यात आलेली आहे. ही समिती कार्यकर्त्यांशी चर्चा करून याविषयीचा प्रस्ताव श्रेष्ठींकडे पाठवतील. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. कॉंग्रेसकडून अद्याप याविषयीचा प्रस्ताव आलेला नाही,'' असे काकडे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.