सातारा - 'शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाहून घेणाऱ्या "रयत'चे विद्यापीठ झाले पाहिजे. त्यासाठी सर्व सहकार्य मी करणार आहे,' असे आश्वासन केंद्रीय मनुष्यळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात दिले.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज कर्मवीर समाधी परिसरात झाला. त्या वेळी श्री. जावडकेर, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार विश्वजित कदम, शशिकांत शिंदे, टाटा टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष दिलीप बंड, महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, डॉ. आनंद भदे, पोस्टमास्तर जनरल कर्नल एस. एफ. एच रिजवी, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपकार्याध्यक्ष डॉ. भगीरथ शिंदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे आदी उपस्थित होते.
श्री. जावडेकर म्हणाले, 'संस्थेने 99 वर्षांत शिक्षणाचा प्रसार करून गुणवत्ताही मिळविली आहे. रयत विद्यापीठ झालेच पाहिजे. त्यासाठी सर्व सहकार्य करणार आहे. फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, नामदार गोखले, टिळक, आगरकर यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली. कर्मवीरांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. चांगले विद्यार्थी आणि चांगले शिक्षक तयार केले. आता संस्थेने गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. त्यामुळेच सायन्स टेक्नॉलॉजी सेंटर सुरू होत आहे. शिक्षणातील परिवर्तन हेच देशाचे परिवर्तन आहे.''
केंद्राने अटल टिंकरिंग लॅब शाळांतून सुरू केल्या आहेत. त्यातून उद्याचे संशोधक तयार होणार आहेत. आता पुढे जाऊन आयआयटी मुंबई येथे सहा रिसर्च पार्क सुरू करणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
श्री. पवार म्हणाले, ""रयत विद्यापीठाला मान्यता देण्याचे श्री. जावडेकर यांनी मान्य केल्याने आता येत्या दहा तारखेलाच त्यांच्याकडे विद्यापीठाचा प्रस्ताव देणार आहे. शताब्दी वर्षात जावडेकरांच्या माध्यमातून कर्मवीरांचे रयत विद्यापीठाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
संस्थेने शिक्षणाचा प्रसार केला. गुणवत्ता मिळविली. त्याही पुढे जाऊन आता नव्या पिढीत संशोधक वृत्ती वाढवायची आहे. नवनिर्मितीत युवक कसे सहभागी होतील हे पाहायचे आहे. टाटा टेक्नॉलॉजी येथे आणली आहे. त्याचा उपयोग नव्या पिढीला होणार आहे.''
डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. कराळे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव प्राचार्य विजयसिंह सावंत यांनी आभार मानले. या वेळी विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांचे चित्र असलेले पोस्टाचे पाकीट व तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
बीएड चार वर्षांचे
शिक्षकही ज्ञानाने समृद्ध असला पाहिजे. तज्ज्ञ असला पाहिजे. त्यासाठी आता बीएड पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा करणार आहे. ज्याला खरेच शिक्षक व्हायचे आहे, त्यानेच बीएडला गेले पाहिजे, असे सांगून श्री. जावडेकर यांनी नव्या तंत्रज्ञानाने शिक्षणाची गरज सांगताना आता ऑपरेशन ब्लॅकबोर्ड नाही, तर "ऑपरेशन डिजिटल बोर्ड' सर्व शाळांत राबविणार असल्याचे नमूद केले.
|