शिंदेंसारखे नेतृत्व घडणं हे लोकशाहीचे यश - प्रणव मुखर्जी

सोलापूर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी मानपत्र स्वीकारताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे.
सोलापूर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी मानपत्र स्वीकारताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे.

सोलापूर - स्वतंत्र भारताच्या आकांक्षा, स्थानिक लोकांच्या अपेक्षांचे सुशीलकुमार शिंदे प्रतीक आहेत. ते माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक करत नाही तर त्यांनी ज्या कठीण परिस्थितीवर मात करून यश मिळविले आहे त्या यशासाठी मी त्यांचे कौतुक करत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकास संधी मिळते. या संधीचे सोने करतानाच सोलापूरच्या प्रतिकूल परिस्थितीतही सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेतृत्व घडणं हे भारतीय लोकशाहीचे यश असल्याचे गौरवोद्‌गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे काढले.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रपती श्री. मुखर्जी बोलत होते. कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार अशोक चव्हाण, खासदार पी. चिदंबरम, खासदार कुमारी शैलजा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, श्री. शिंदे यांच्या अद्‌भुत रम्यकथा ऐकल्या की त्यांच्या जीवनाची वाटचाल अनुकूल स्थितीत कशी झाली ते समजते. त्यांच्या पूर्ण आयुष्याची कहाणीच संघर्षमय आहे. देशाचे ऊर्जामंत्री, गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. देशाच्या राजकारण व प्रशासनातील मोठमोठ्या व्यक्ती आज या मंचावर उपस्थित आहेत हे शिंदे यांच्या यशाचे प्रतीक आहे. अनेक आर्थिक, जातिभेदाच्या अडचणी भेदत त्यांनी परिस्थितीवर मात केली. आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक विकासाचा दृष्टिकोन ठेवून आणि सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सर्वच पदांना योग्य न्याय दिला. शिंदे यांची संघर्षमय आणि खडतर वाटचाल ही तरुणांना प्रेरणादायी, आदर्शवतच आहे. श्री. शिंदे यांच्या या यशामध्ये निश्‍चितच त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांचा मोलाचा वाटा आहे. आता शिंदे यांचा शताब्दी महोत्सव साजरा व्हावा.

या वेळी संयोजक डॉ. डी. वाय. पाटील, खासदार शरद पवार, सत्कारमूर्ती सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मनोगते व्यक्त केली. प्रदीप भिडे यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर खरटमल यांनी आभार मानले. 

नेहरू आणि अन्थोनी

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांचे ब्रिटिश राजकारणी मित्र अन्थोनी यांच्यातील वादविवादाचा अनुभव राष्ट्रपती मुखर्जी यांनी या वेळी सांगितला. नेहरूंनी २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय लोकशाही पद्धत स्वीकारली, तेव्हा ब्रिटिश राजकारणी मित्राने रोगराई, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण, भरमसाट लोकसंख्या या देशापुढील आव्हानांमध्ये लोकशाही कशी यशस्वी होईल, अशी शंका उपस्थित केली. त्याच अधिकाऱ्याने आठ वर्षांनंतर भारतीय लोकशाहीबद्दल मते मांडली. एवढ्या सर्व अडचणींवर मात करून यशस्वी झालेला भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी मान्य केल्याचाही दाखला राष्ट्रपतींनी या वेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com