सांगलीत युती भाजपसाठी बेरजेची

सांगलीत युती भाजपसाठी बेरजेची

सांगली - अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालं...भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा आघाडी झाल्याने मतविभागणी टाळण्यासाठी युती होणे दोन्ही पक्षांसाठी गरजेचे होते. सांगली तर काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला,  तो पुन्हा हस्तगत करण्यासाठी आघाडी झाली. त्याला टक्कर देण्यासाठी भाजपसाठी युती अपरिहार्य होती.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचा फायदा कुणाला याचे गणित घातले जाऊ लागले आहे. सांगलीत सहा विधानसभा मतदार संघात लोकसभेचा मतदार संघ आहे. तर इस्लामपूर आणि शिराळा हे दोन मतदार संघ हातकणंगले लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता आहे. त्या तुलनेत शिवसेनेची ताकद  नगण्य आहे. जिल्ह्यात सध्या खासदार आणि चार  आमदार तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व महापौर हे  सर्व भाजपचे आहेत. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपचे कमळ इतके खोलवर रुजले आहे. त्या तुलनेत शिवसेनेकडे एकच आमदार आहेत. महापालिकेत तर शिवसेनेचे अस्तित्व नगण्य झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा भाजपकडे आहे. विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच सांगलीत  उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्‍चित आहे. आमदार अनिल बाबर यांनी आधीच युतीचा धर्म पाळणार असल्याचे जाहीर केलेय. त्यामुळे संजय पाटील यांना त्यांची मदत होईल. युतीमुळे शिवसेनेचा इतर मतदार संघांमध्येही त्यांना फायदा होऊ शकतो. तरीही जिल्ह्यातील भाजपची ताकद पाहता त्यांना युतीची गरज होती असे नाही. 

विधानसभेला निम्म्या-निम्म्या जागा वाटपाचे सूत्र  ठरल्याने प्रत्येकी चार जागा दोघांच्या वाटणीला येतील. त्यातही विद्यमान चार आमदारांच्या जागाच भाजप  ताब्यात ठेवणार असे दिसते. उरलेल्या चारपैकी विटा मतदार संघ शिवसेनेकडेच आहे. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तीन मतदार संघात इस्लामपुरातच शिवसेनेचे अस्तित्व दिसते. या तीनही ठिकाणी भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपवरच अवलंबून रहावे लागणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसमोर आव्हान उभे करण्यासाठी भाजप-शिवसेना युती आवश्‍यक होती. ती झाली हे चांगलेच. आमचे विचार वेगळे नाहीत. मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र आलोय. दोघांनाही एकमेकांचा फायदा होणार आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.
-सुधीर गाडगीळ,
आमदार, सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com