मरण झाले स्वस्त! टेंभुर्णी- अहमदनगर मार्गावर आपघातांची मालिका सुरूच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : टेंभुर्णी-करमाळा-अहमदनगर महामार्गावर मंगळवारी (ता. 21) पुन्हा एकदा मन हेलावून टाकणारी घटना घडली. चौपदरीकरणाचे अर्धवट काम हेच या अपघाताचे कारण आहे. अपघाताची मालिका थांबण्यास तयार नसतानाही सरकार केवळ डागडुजीची मलमपट्टी करत संबंधित मक्‍तेदाराच्या पाठीशी का आहे, असा प्रश्‍न यातून पुन्हा निर्माण झाला आहे. 

टेंभुर्णी-करमाळा-अहमदनगर हा महामार्ग जातेगावापर्यंत (60 किमी) सोलापूरच्या हद्दीत आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मुदत संपूनही काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे सतत अपघात होत आहेत. यावर कायमचा तोडगा न काढता केवळ डागडुजी केली जात आहे. गेल्या काही दिवसांत खड्डे बुजविण्यासाठी एक कोटी मंजूर झाले; मात्र काम संथगतीने सुरू आहे. याबाबत "सकाळ'चा पाठपुरावा सुरू आहे. सतत अपघात होणारी ठिकाणे तरी त्वरित दुरुस्त करावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. साखर कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस वाहतुकीवेळी अपघातांची संख्या वाढणार, अशी शक्‍यता आधीच व्यक्त केली जात होती. या रस्त्यावर सतत ऊस वाहतुकीची वाहने उलटत आहेत. त्याकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज देवळाली (ता. करमाळा) येथील दोन निष्पापांचे बळी गेले नसते. टेंभुर्णी ते जातेगावादरम्यान नेहमीच लहान-मोठे अपघात होत आहेत. यामुळे सरकार विरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड सुरू आहे. 

"नगर रोड केव्हा चांगला होणार?' या मथळ्याखालील ब. गो. अहंकारी यांचे पत्र खूप बोलके होते. त्यात त्यांनी म्हटले, ""एका जाहिरातीत एका गावाचा रस्ता खराब असतो. तरुण मुले मंत्र्यास गावच्या जत्रेचे निमंत्रण देतात व त्यांना घेऊन येतात. येताना रस्ता खराब असल्याने मंत्री म्हणतात, "शांताराम, हा काय रस्ता आहे? लवकर दुरुस्त करा.' आता नगरला कोणत्या मंत्र्याला न्यावे, म्हणजे हा रस्ता बांधतील आणि दुरुस्तीचा आदेश देतील...'' पण जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचे या महामार्गावरून सततचे जाणे-येणे सुरू असते; मग या रस्त्याकडे हे का दुर्लक्ष करताहेत? 

अधीक्षक अभियंत्याचा "नो रिस्पॉन्स'... 
टेंभुर्णी-करमाळादरम्यान महामार्गावर सतत अपघात होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यांच्या कार्यालयात ते कधी असतात, हे कोणालाच माहीत नाही. सतत फिल्डवर गेल्याचे सांगितले जाते. मोबाईलवर संपर्क साधला तरीही रिस्पॉन्स देत नाहीत. त्यांचे सहकारीही टोलवाटोलवीची उत्तरे देतात. अपघातात बळींची संख्या वाढत असताना ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com