
Solapur News : भोसे पाणी योजनेतील प्रशासनाचा दोष जनतेच्या माथी का ? आ. आवताडे
मंगळवेढा : भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये प्रशासनाने चुका केल्या मात्र दोष या भागातील दुष्काळी जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत या योजनेची चौकशी करण्याची मागणी आ.समाधान आवताडे यांनी आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी व्दारे केली.
आज सकाळच्या सत्रात आ.समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी मध्ये भोसेसह 40 गावाची तहान भागवण्यासाठी संजीवनी ठरलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी 71 कोटीचा खर्च करून केला मात्र त्यामधील 11 गावाला अद्याप पाणी पोहोचले नाही तर 5 गावातील टाक्यांमध्ये पाणी चढत नाही अधिकाऱ्यानी तांत्रिक मान्यता देताना याबाबत खातरजमा केली नव्हती.
सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंचायत राज पाहणीच्या दौऱ्यात देखील आ. समाधान आवताडे यांनी ही मागणी केली होती मात्र पंचायतराज समितीने याबाबत पुढे काय केले हा विषय गुलदस्त्यात राहिला परंतु उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आ.समाधान आवताडे यांनी आज पुन्हा लक्षवेधी द्वारे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीज बिल शासन माफ करणार का ?
40 गावाला टँकरने पाणीपुरवठा करणार का ? वीज बिलाला पर्याय म्हणून सौर ऊर्जा वापरून वीज पुरवठा सुरळीत करणार का ? व या सदर योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करणार का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते यावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की सदर योजनेचे योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी विज बिल भरणे आवश्यक असून वीज बिलाचे टप्पे करून देण्याबाबत ऊर्जा मंत्राला विनंती करू.
तसेच 11 गावाला पाणी पोहोचले नसलेल्या प्रकरणाची चौकशी देखील करू व सोलर द्वारे वीज पुरवठा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.शिवाय ज्या ग्रामपंचायतीकडे विज बिल पाणीपट्टी थकले आहेत त्यांनी त्यांच्या थकबाकीतील 5 टक्के 10 टक्के रक्कम भरण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून या योजनेचे पाणी सुरू करण्यात येईल असे आश्वासन या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी दिले