सोलापूर - बडोद्याला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असते, तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा होऊ शकली असती, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. स्थानिक संयोजक संस्थेने सुरक्षेच्या कारण पुढे केले असले तरी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान न देण्यावर एकमत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर कुलकर्णी म्हणाले, की मराठी अभिजात भाषा अहवालास पंतप्रधान कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. पंतप्रधान बडोद्यात आले असते तर हे काम त्वरेने होण्यास मदत झाली असती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांचे गुरू क्षेत्रीय संघप्रचारक लक्ष्मणराव इनामदार हे मराठी असल्याने त्यांना मराठीबद्दल आत्मीयता आहे. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही आडकाठी येणार नाही.
- सुधीर देव, साहित्यरसिक, सोलापूर
|