सोलापूर - महिलांनी आज सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. आजची महिला अबला नाही तर सबला आहे. पुरुषांचा मान ठेवत आपल्याला पुढे जायचे आहे. पुरुषांनी आजपर्यंत महिलांना दाबून ठेवले आहे. महिला काही काळ दबून राहतील, संधी मिळाल्यानंतर महिलाही पुरुषांच्या पुढे जाऊन कामगिरी करतात. येणारा काळ महिलांचाच असल्याने मुलांएवढेच मुलींनाही शिकवा, असा संदेश अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांनी आज दिला.
पतंजली योग समितीच्यावतीने महिला दिन व नूतन वर्षानिमित्त आज सोलापुरात झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी अमृता फडणवीस, योगगुरू रामदेवबाबा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेमामालिनी म्हणाल्या, 'स्त्री या सृष्टीची निर्माती आहे. स्त्रीच्या वाट्याला येणारे आई, बहीण, मुलगी, सून, आजीचे नाते सक्षमपणे पार पाडा. आई- वडिलांनी मुलांसमोर मारहाण अथवा भांडण करू नये, त्याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर होतो. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी योग साधना आवश्यक आहे.'' पतंजलीच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही या वेळी झाले. योगगुरू रामदेवबाबा यांनी या वेळी योगासने करून दाखविली.
महिला संघटित असतील तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही. या देशातील स्त्रियांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. पतंजलीमुळे स्वदेशी वापराची सवय लागली.
- अमृता फडणवीस
जीवन तेव्हाच चांगले होईल, जेव्हा जीवनात योगा येईल. पतंजलीच्या माध्यमातून देशातील पाच कोटी शेतकऱ्यांना जोडायचे आहे. एक कोटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणायचे आहे. सध्या असलेली शिक्षणपद्धती बदलून भारतीय शिक्षणपद्धती रुजवायची आहे. 2050 पर्यंत भारत जगात आध्यात्मिक शक्ती म्हणून निर्माण करायची आहे.
- रामदेवबाबा
|