वीजतोडणी मोहिमेमुळे पाणीपुरवठा विस्कळित

वीजतोडणी मोहिमेमुळे पाणीपुरवठा विस्कळित

सोलापूर - महावितरणने राज्यभर वीजतोडणी मोहीम तीव्र केली आहे. त्याचा फटका गावाच्या पाणीपुरवठा योजनांना बसला आहे. अनेक गावांचा पाणीपुरवठा यामुळे विस्कळित झाला आहे. शेतीपंपांच्या वीजजोडण्यांवर काही गावांचा पाणीपुरवठा आहे. महावितरणने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर झाला आहे.

महावितरणने सुरू केलेल्या या मोहिमेचे तीव्र पडसाद शेतकऱ्यांमध्ये उमटू लागले आहेत. त्यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींनीही या मोहिमेला जोरदार विरोध केला आहे. मात्र, त्याची दखल सरकार कितपत घेते, यावर सर्व काही अवलंबून आहे.

दरम्यान, आज सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली. आम्हाला महावितरणकडून विजेची बिले दिली जात नाहीत. त्यामुळे ती बिले आम्ही कशी भरणार, अशी विचारणा त्यांनी केली. त्या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना याबाबत चौकशी करून बिले न देणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात विजेची बिले भरण्याचे आवाहनही देशमुख यांनी या वेळी केले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष
महावितरणची वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम मागील चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. अचानकपणे सुरू केलेल्या या मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे याबाबत उद्या (मंगळवारी) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय होतो, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com