धरणक्षेत्रात व पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा परिणाम
सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मागील 20 दिवसांमध्ये 12.02 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणक्षेत्र व पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने ही वाढ झाली आहे. टीएमसीमध्ये मोजायचे झाले तर या कालावधीत धरणात 6.44 टीएमसी पाणी वाढले असल्याचे दिसून येते.
उजनी धरण 100 टक्के भरले तर सोलापूर जिल्ह्यातील शेती हिरवीगार होते. उजनीच्या पाण्यावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येते. मागील तीन-चार वर्षांत दुष्काळामुळे जिल्ह्याच्या उसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, मागील वर्षी व यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. मागील वर्षी धरण 100 टक्के भरले होते.
यंदाही तशीच अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. यापुढील नक्षत्रामध्ये पाऊस कसा होतो यावर उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून आहे. यंदाच्या वर्षी पावसाने चांगली सुरवात केली आहे. त्यामुळे यंदाही उजनी लवकरच भरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. उजनीची पाणीपातळी वजा 31.23 टक्यांपर्यंत गेली होती. मात्र, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाणीपातळीमध्ये वाढ होत गेली. आजअखेर धरणामध्ये 12 टक्के पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. धरणामध्ये आज वजा 19.21 टक्के पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा वजा 10.29 टीएमसी इतका आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा टक्केवारीमध्ये
माणिकडोह - 14.37, येडगाव - 13.95, वडज - 38.37, डिंभे - 22.30, विसापूर -2.38, कळमोडी -100, चासकमान - 29.32, भामा-आसखेड -35.23, वडिवळे - 29.45, आंध्र - 70.80, पवना - 40.10, कासारी - 47.20, मुळशी - 26.62, टेमघर - 11.49, वरसगाव - 12.88, पानशेत - 39.77, खडकवासला - 21.39
|