मुलांवर नको अपेक्षांचे ओझे! MBBSच्या पहिल्या वर्षात तीनवेळा अनुत्तीर्ण तरूणाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर आकाश संतोष जोगदंड याने एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तीनवेळा परीक्षा देऊनही ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्गातील विषय निघत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याच पोलिस तपासात समोर आलं आहे.
Doctor News
Doctor Newsesakal

सोलापूर : येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर आकाश संतोष जोगदंड (रा. चौसाळा, जि. बीड) याने आसार मैदानाजवळील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता. ५) ही बाब उघडकीस आली. तीनवेळा परीक्षा देऊनही ‘एमबीबीएस’च्या पहिल्याच वर्गातील विषय निघत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील आकाशने २०२० मध्ये डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याने आतापर्यंत तीनवेळा परीक्षा दिली, पण आकाशला प्रथम वर्षाच्या सर्व विषयात उत्तीर्ण होता आले नव्हते. त्यामध्ये तो नेहमीच तणावात असायचा. उन्हाळा सुट्ट्यांमुळे तो गावी गेला होता.

चार दिवसांपूर्वी तो परीक्षेच्या निमित्ताने सोलापुरात आला होता. त्याने परीक्षा संपेपर्यंत आसार मैदानाजवळील लॉजच्या पहिल्या मजल्यावरील खोली भाड्याने घेतली होती. त्याला मागील बॅकलॉग आणि आता नव्या विषयात उत्तीर्ण होणे आव्हानात्मक वाटत होते. त्या तणावातूनच त्याने बाजारातून दोरी विकत आणून रविवारी (ता. ४) मध्यरात्री गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

आतून बंद असलेला दरवाजा पोलिसांनी तोडला आणि आत प्रवेश केला. त्यावेळी आकाशचा मृतदेह खोलीतील पंख्याजवळील हुकाला लटकत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. त्याचे कुटुंबीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल होताच, सर्वांनीच आकाशचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला होता. दरम्यान, फौजदार चावडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चिठ्ठी लिहून मागितली आई-बाबांची माफी अन्...
‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या आकाशने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तो म्हणतो, ‘मला डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही, त्याबद्दल आई-बाबांनी मला माफ करा. मला परीक्षेतील अनुत्तीर्ण विषय काढणे शक्य होईना. त्यामुळे मी जगाचा निरोप घेतोय, आई दीदीची काळजी घे, तिला नीट सांभाळ’ माझ्या मृत्यूची बातमी आई-बाबांना सांगू नका, मामाला सांगा’ माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका’ असा मजकूर आकाशने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांनी दिली.

‘ठेविले अनंते तैसेचि रहावे| चित्ती असो द्यावे समाधान...
तुकाराम महाराज म्हणतात, 'ठेविले अनंते तैसेचि रहावे| चित्ती असो द्यावे समाधान||' या उक्तीप्रमाणे जो वागतो, त्याला आयुष्यच सार समजल्याने तो सुखी जीवन जगतो. शेवटी एवढंच, आयुष्यात समाधानी असणे खूप महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती समाधानी आहे, त्यालाच सुख प्राप्त होते. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे अवाढव्य ओझे द्यायला नको. आयुष्यात नेहमी समाधानी रहायला शिका. अपेक्षा जरूर ठेवा, पण त्याच ओझं होऊन परिस्थिती बिघडण्याच्या अगोदरच त्यावर नियंत्रण ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com