सोलापूर : इयत्ता बारावीची उद्यापासून (मंगळवार) बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा बोर्डाने कडक पाऊल उचलले असून पेपर सुरु झाल्यापासून तब्बल पाच तास तपासणी व बैठे पथक परीक्षा केंद्रांवर ठाण मांडून असणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्रपणे भरारी पथक नेमले असून जिल्हा परिषद, महसूल व शिक्षण विभागांची देखील स्वतंत्र भरारी पथके असणार आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर हजेरी बंधनकारक आहे.
बारावीसाठी सोलापूर जिल्ह्यात ११४ परीक्षा केंद्रे असून ५३ हजार ५८४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला जाणार आहे. पेपर सुरु होण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची पडताळणी करूनच परीक्षा हॉलमध्ये सोडले जाणार आहे. पेपर सुरु झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेसाठी बसता येणार नाही.
जिल्ह्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रत्येक तालुक्यातील नायब तहसीलदारांच्या भरारी पथकाचा वॉच राहणार आहे. विद्यार्थ्यांची तपासणी करणारे पथक व केंद्रावरील बैठे पथक परीक्षा होईपर्यंत त्याच ठिकाणी ठाण मांडून असणार आहे. तहसीलदारांचे एक पथक प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देईल. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भरारी पथके जिल्हाभर फिरतील.
या पथकांचे परीक्षेत गैरप्रकार होणार नाहीत, पेपर सुरु झाल्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगण्याच्या प्रकारावर देखील विशेष लक्ष असणार आहे. पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तर केंद्रापासून १०० मीटर अंतरावरील झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
आत्मविश्वासाने पेपर लिहावा
कॉपी प्रकरणात अडकून शिक्षा होणार नाही, याची दक्षता सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यावी. परीक्षेचा कोणताही तणाव न घेता प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने आनंदात परीक्षा द्यावी. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा जिल्हा, तालुकास्तरावरील भरारी पथके आणि बैठे व तपासणी पथके देखील असतील.
- सुलभा वठारे, प्रभारी शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सोलापूर जिल्हा परिषद
सोलापूर जिल्ह्याची स्थिती
बारावीसाठी परीक्षा केंद्रे
११४
परीक्षार्थी
५३,५८४
संवेदनशील केंद्रे
२४
दहावीसाठी परीक्षा केंद्रे
१७६
परीक्षार्थी
६४,४२४
संवेदनशील केंद्रे
२०
शेवटी दहा मिनिटांचा वाढीव वेळ
पेपर सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जात होती. पण, कॉपी पुरविणाऱ्यांना किंवा करणाऱ्यांसाठी तीच संधी मानली जाते. त्यामुळे यंदा तो वेळ न देण्याचा निर्णय पुणे बोर्डाने घेतला आहे. पेपर सुटताना शेवटी दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. वेळेचे नियोजन करून विद्यार्थ्यांनी पेपर लिहिल्यास निश्चितपणे वेळेत सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविता येणार आहेत. परीपूर्ण अभ्यास करा, ताणतणाव घेऊ नका.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.