बीज प्रक्रियेच्या जिवाणूंचा तुटवडा

बीज प्रक्रियेच्या जिवाणूंचा तुटवडा

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी'या अभंगातील आशय पेरणीसाठी शुद्ध बीज वापरण्याचे सांगतो. मात्र, यंदा सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामाच्या प्रारंभीच बीज प्रक्रियेसाठी आवश्‍यक असणाऱ्या जिवाणूंचा मोठा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत. 

कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी त्याच्या बियाणांची शुद्धता करावी लागते. त्यासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची असते. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी मका, कांदा या नगदी पिकांबरोबर सूर्यफूल, सोयाबीन, तूर, मूग, हुलगा व उडदाची पेरणी करत असतात. या वेळी प्रारंभी पूर्व मोसमी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले असतानाच बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जिवाणूंचा मोठा तुटवडा भासू लागला आहे. 

कृषी विज्ञान केंद्राने जिवाणू मागवले 
कृषी विभागाकडे सध्या याची कोणतीच योजना नाही. कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व मोहोळ कृषी विज्ञान केंद्रातही सध्या रायजोबियम व पीएसबी हे जीवाणू उपलब्ध नाहीत. सोलापूर कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र व मोहोळ कृषी विज्ञान केंद्राने मागवलेल्या जिवाणूला शेतकऱ्यांची मागणी वाढली. त्यामुळे या दोन्ही केंद्रांतील हे जिवाणू दोन ते चारच दिवसांत संपले आहेत. तर, सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने हे जिवाणू मागवले आहेत. 

जिवाणू खात्रीशीर मिळत नाहीत 
याबाबत सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांच्याशी संपर्क झाला नसल्याने अधिक माहिती समजू शकली नाही. मात्र, बाजारात हे जिवाणू खात्रीशीर मिळत नाहीत. मिळालेच तर प्रतिलिटर किंवा प्रतिकिलो 400 ते 500 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. कीड व रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. नत्र स्थिरीकरण व स्फुरद उपलब्ध करणाऱ्या रायजोबियम व पीएसबी या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या असलेल्या जिवाणूंचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे हे जीवाणू उपलब्ध व्हावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

शेतकऱ्यांची मागणी वाढली 
आमच्या कोरडवाहू कृषी संशोधन केंद्रातर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करता यावी म्हणून विविध प्रकारचे जिवाणू विक्रीसाठी ठेवले होते. मात्र, त्याला शेतकऱ्यांची मागणी वाढल्यामुळे जिवाणू दोन ते तीनच दिवसांत संपले आहेत. 
- डॉ. डी. व्ही. इंडी, 
सहयोगी संचालक, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र, सोलापूर 

मागणीचा परिणाम 
आम्ही शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विविध प्रकारचे जिवाणू विक्रीसाठी मागवले होते. शेतकऱ्यांची इतकी मागणी झाली. त्यामुळे ते जिवाणू लगेच संपले आहेत. 
- डॉ. तानाजी वळकुंडे, 
कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ 

उत्पादन खर्चात वाढ 
बीज प्रक्रियेसाठी खूप कमी प्रमाणात जिवाणू वापरावे लागतात. मात्र, खात्रीशीर जिवाणू बाजारात मिळत नाहीत. मिळालेच तर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. 
- अविनाश शेटे, 
शेतकरी, पंढरपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com