महूद : समाजाच्या भल्यासाठी सकारात्मक व गांधीवादी विचाराने प्रेरित झालेल्या सोनंद (ता. सांगोला) येथील लालासाहेब बाबर यांनी अनेक पिढ्यांना दिशा देण्याचे काम केले. आपल्या सकारात्मक विचारातून त्यांनी असंख्य माणसे घडवली. आज ही वयाच्या ९२ व्या वर्षी सायकलवरून प्रवास करत आपले हे काम अविरत सुरू ठेवणाऱ्या या आरोग्यसंपन्न तरुणास आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ विद्यापीठाने पीएच.डी.पदवी नुकतीच प्रदान केली आहे. युवकांना त्यांच्या अनुभवाचा फायदा होण्यासाठी फेलोशिपही मंजूर करण्यात आली आहे.
सोनंद (ता.सांगोला) येथील ९२ वर्षाचे माजी सरपंच व गांधीवादी नेते लालासाहेब बाबर यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाची पीएच.डी.पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. काही माणसं विशिष्ट विचाराने झपाटलेले असतात. हे झपाटलेपण त्यांना निसर्गाने जन्मतःच दिलेले असते. या माणसांनी वाचलेला असतो समाज. झपाटलेपण या समाज वाचनातून त्यांना मिळाले आहे. त्याच्यातून सामाज बदलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. लालासाहेब बाबर हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.
लालासाहेब बाबर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. ब्रिटीशांनी केलेला अन्याय आणि अत्याचार ते जवळून पाहत होते. याच्या विरोधात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्यांच्या हृदयामध्ये ठिणगी निर्माण झाली होती. १९५२ मध्ये लालासाहेबांनी शिक्षकी व्रत स्वीकारले. हे केवळ मुलांना पाठांतर करणे आणि त्यांना लिहायला व वाचायला शिकवणे एवढे मर्यादित नव्हतं; विद्यार्थ्यांना समाजात होणारा अन्याय, अत्याचार,अनिष्ठ प्रथा आणि परंपरा यांच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये ठिणगी पेटवून त्यांना पुस्तका बरोबरच समाज वाचण्यासाठी ही प्रेरणा त्यांनी दिली.
सरपंच पदाचा वापर त्यांनी पूर्णपणे गावाच्या मूलभूत परिवर्तनासाठी केला. त्यांनी गावांमध्ये स्वतंत्र तरुणांची एक फळी ग्रामसुरक्षा दल उभारून चोरट्यांना पायबंद घातला.काँग्रेस विचारासोबत त्यांनी कार्याला सुरुवात केली. आजही वयाच्या ९२ व्या वर्षी ते याच विचाराने कार्यरत आहेत. लालासाहेब ९२ वर्षांचे असतानाही त्यांचा उत्साह व त्यांची स्मरणशक्ती ही विलक्षण कौतुकास्पद आहे. जेव्हा जुन्या आठवणी निघतात,जुन्या कामाच्या संदर्भात चर्चा होते तेव्हा लालासाहेब तरुणासारखे बोलायला लागतात. लालासाहेबांच्या अंगी असणारा सळसळत्या उत्साह, त्यांची निर्भेळ आणि स्वच्छ वाणी आणि त्यांच्या मनात अद्यापही शिल्लक असलेली ठिणगी ही त्यांच्या रोमारोमातून प्रकटते.
त्यांचे वडील हे ग्वाल्हेर संस्थानाच्या हत्तीखाना विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते. या ठिकाणीच भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वडिलही नोकरीला होते. अटलबिहारी वाजपेयी यांचे वडील आणि लालासाहेबांचे वडील जीवलग मित्र होते.त्यामुळे लालासाहेब आणि अटलबिहारी वाजपेयी एकाच बग्गीत बसून शाळेला जात असत. परंतु विशेष म्हणजे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्याच्या नंतर इतका जवळचा मित्र असूनही लालासाहेबांनी कधीही त्यांच्याकडे कोणतीही मागणी केली नाही. वयाच्या ९२ व्या वर्षीही ते समाजातील वाईट परंपरा, चालीरीती, धर्मांधता, जातीयवाद, भ्रष्टाचार, मुलगा-मुलगी भेद यावर बोलायला लागतात, तेव्हा असं वाटतं की हा ९२ वर्षाचा वृध्द नव्हे;तर २९ वर्षांचा तरुण बोलतोय. लालासाहेबांना इंटरनॅशनल कॉमनवेल्थ यूनिवर्सिटीने पी.एच.डी.देवून सन्मानीत केले ही अतिशय उल्लेखनीय आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक घटना आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.